गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

नागांचा आदिमबंध


 नागांचा आदिमबंध

श्री एम यांच्या ‘हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन’ या आत्मचरित्रात एक प्रसंग आहे. सत्य हे बऱ्याच वेळा कल्पनेपेक्षा अदभूत असू शकते याची ती प्रचिती. श्री एम यांचे गुरू महेश्वरनाथ बसलेल्या गुहेत आकाशातून एक अग्नीलोळ येतो व त्यातून एक सर्प प्रकट होऊन बाबाजींशी संभाषण करून पुन्हा त्याच मार्गाने निघून जातो. त्यावर महेश्वरनाथ नागलोकाविषयी अनेक गोष्टी सांगतात. आकाशगंगेमध्ये सात ग्रह व अठरा चंद्र असलेली एक सौरमाला असून त्यापैकी एका ग्रहाला सर्पलोक म्हटले जाते. त्या ग्रहावर अत्यंत प्रगत अशी फणा असलेली सर्प जमात वास्तव्य करते. त्या लोकांना नागदेवता असे म्हटले जाते. अनेक पुरातन संस्कृतीमध्ये नागपुजेला जे स्थान दिले आहे ती पूजा म्हणजे प्रगत अशा नागसंस्कृतीला दिलेली एक मानवंदनाच ठरते.
सर्पकुळात अधिष्ठाता। वासुकी गा मी कुंतीसुता। नागांमाजी समस्ता। अनंतु तो मी।।
                                     -ज्ञानेश्वरी अध्याय १० वा  
श्रीकृष्ण भगवदगीतेत सांगतात, सर्पांचा राजा वासुकी मी तर नागांचा राजा अनंत मी यावरून या कुळाचे श्रेष्ठत्व लक्षात येते. अरूण ताह्मणकरांचे ‘सर्पंगंध’ नावाचे एक पुस्तक वाचण्यात आले होते. त्यात नागांचे अतिशय सुरस वर्णन केलेले होते. त्यांनी नागांचा व कुंडलिनी शक्तीचा संबंध जोडलेला होता.
नागाचें पिलें, कुंकुमे नाहलें। वळण घेऊनि आलें, सेजे जैसें।। २२२
तैशी ते कुंडलिनी, मोटकी औट वळणी अधोमुख सर्पिणी, निजैली असे।। २२३
                        -ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा
श्री ज्ञानेश्वर जेव्हा कुंडलिनीचे वर्णन करतात तेव्हा ते नागाचा व सर्पांचा आधार घेतात. यावरूनही त्यांचे महात्म्य आपल्या लक्षात यावे. सर्पकूळ किती आदिम तर रामचरितमानसमध्ये विनता व कद्रुची एक कथा आली आहे, महाभारताच्या आदिपर्वामध्येही ती येते. दक्ष प्र्रजापतीच्या दोन कन्या, विनता व कद्रु यांनी कश्यप ऋषींसोबत विवाह केला. एकदा प्रसन्न होऊन कश्यप ऋषींनी त्यांना वरदान मागायला सांगितले तेव्हा कद्रुने एक हजार पराक्रमी पुत्रांची आई होण्याचे व विनताने दोनच परंतु कद्रुच्या पुत्रांपेक्षा अधिक पराक्रमी ते असावेत असा वर मागितला. त्याप्रमाणे कद्रुला एक हजार पुत्र झाले. तेच सर्प असे मानले जाते. विनताचे मुलगे अरूण(हा सुर्याचा सारथी) व दुसरा गरूड. तर असे हे महापराक्रमी सर्प. गरूडाने अमृतकुंभ आणून ज्या चऱ्यांवर ठेवला तेथे अमृतकण सांडले असतील म्हणून सर्पांनी ते चरे जिभेने चाटण्याचा प्रयत्न केल्याने त्यांची जीभ मधोमध कापली गेली व त्या दोन झाल्या असाही एक संदर्भ महाभारतात आहे तर सर्पांचा उल्लेख महादेवपुराणातदेखील आढळतो. मंदराचल पर्वताची रवी करून वासुकी सर्पाची दोरी करून समुद्र्रमंथन केले तेव्हा त्यातून हलाहल बाहेर आले, ते सृष्टीला जाळत असताना महादेवाने ते प्र्राशन केले हे त्यात आलेच आहे परंतु समुद्रात जे विष पसरले होते ते पिण्याचे काम या सर्पांनीच केले आणि मानवजगताला अभय प्रदान केले. नागांचा संदर्भ असा आदिम आहे. आपण पुराणकाळापासून देवघरात ज्या नाग-नरसोबाची पूजा करतो तो म्हणजे नागांप्रती कृतज्ञता भावच आहे. नरसोबा म्हणजे नृसिंह महाराज. प्रल्हाद व हिरण्यकश्यपूची ती कथा. दुसरी कथा कालियामर्दनाची, तिसरी कथा जिवत्यांची तर चौथी बुध-बृहस्पतीच्या युद्धाची. या कथा आपल्याला काय सांगतात? केवळ कृष्णाने कालियामर्दन केले, अथवा जिवत्यांनी बाळांना मांडीवर घेऊन जोजावले इतकेच का? नाही नाग-नरसोबाच्या पुजनातून आपण हा बोध घेतला पाहीजे की आपली संस्कृती ही आदिम आहे. तिचा आपण अभिमान बाळगला पाहीजे. एका स्त्रीच्या पोटी सर्प कसे आले, तिने एक हजार अंडे कसे दिले, त्यातून सर्पच कसे बाहेर आले, त्यांनी उच्चैश्रवा घोड्याच्या शेपटीला स्वत:ला बांधून घेऊन आई, कद्रुला विजय कसा मिळवून दिला, विनता कशी तिची दासी झाली, सर्पांच्या दोन जिव्हा कशा झाल्या, त्यांनी विष कसे पचवले यातील चमत्कारांचा भाग आपण सोडून देऊ थोडावेळ परंतु पुराणकाळापासून नागजमात ही मानवाची मदत करत आली आहे, ती अगदी शेतातील उंदीर नष्ट करण्याच्या रूपाने असो किंवा आजच्या मॉडर्न सायन्समधील अनेक औषधे हे सर्पांच्या लाळेपासून अथवा विषापासून बनवण्यात आले आहेत येथपर्यंत असो. या आदिम जमातीने मानवासाठी मैत्रीचा हात नेहमी पुढे केला आहे. मुळात महाभारतात तर त्यांना मानवाचाच नव्हे त्यांच्यापेक्षा प्रगत असल्याचा दर्जा दिला आहे. काही शास्त्रांमध्ये असेही येते की जेव्हा गुंतागुंतीच्या प्रश्नांनी आपल्यासमोरचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा आपले पितर नागाच्या माध्यमातून येऊन ते प्रश्न सोडवतात. यातीलही अतिशयोक्ती किंवा फॅण्टसीचा भाग आपण सोडून देऊ, त्यांचे दर्शन म्हणजे मानवजातीसाठी एक आश्वासकता घेऊन येते एवढे जरी यातून आपण घेतले तरी सार्थक.
©️प्रशांत भरवीरकर

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

गोदाघाट : प्रवास शंभर पावलांचानाशिकमध्ये येणारा...




गोदाघाट : प्रवास शंभर पावलांचा
नाशिकमध्ये येणारा...
: गोदाघाट : प्रवास शंभर पावलांचा नाशिकमध्ये येणारा प्रत्येकजण गोदेचा आशीर्वाद घेऊन रविवार कारंजावर प्रवेश करतो...नाशिकमध्ये येतो...खूप...

एनर्जी 


 एनर्जी 
मानवी देहामध्ये शक्तीचे सातपुंजके असतात, क...: एनर्जी  मानवी देहामध्ये शक्तीचे सात पुंजके असतात, कुणी त्याला कुंडलिनी म्हणते, कुणी आणखी काही. या शक्तीपुंजक्याला सकारात्मक ऊर्जा देणारी ...

कृष्णपिसे गहिरे...!



कृष्णपिसे गहिरे...!संदीपची नायिका कधी वादळ कधीशां...
: कृष्णपिसे गहिरे...! संदीपची नायिका कधी वादळ कधी शांत वारा. पावलांच्या ठशाठशामध्ये तिने कितीतरी मनोरम्य आठवणी साचवून ठेवलेल्या असतील. आत...

सोमवार, १८ मार्च, २०१९

उत्सवांची सरमिसळ झाल्याने...!


उत्सवांची सरमिसळ झाल्याने...!

महाराष्ट्र हा उत्सवप्रिय लोकांचा देश आहे. सण कोणताही असो त्याचे उत्सवी स्वरूप येथील कलारसिक माणसांना आनंद देते. होळी, धुळवड आणि रंगपंचमी हे तीन उत्सव यापैकीच. उन्हाळ्याच्या सुरूवातीला येणारे हे तीन उत्सव गेल्या काही वर्षांपासून मात्र गोंधळाच्या वातावरणातच पार पडताना दिसत आहेत. असे असले तरीही नाशिककर मात्र अद्यापही परंपरा राखून आहेत. हे तीनही उत्सव त्या त्या पध्दतीने साजरे करण्यातच त्यांना आनंद वाटतो. होळीला गोवऱ्या, लाकडांची रास रचत अमंगलाच्या नष्टतेचा आनंद साजरा केला जातो. धुळवडीला राख फासत पारंपरिकतेला सलाम केला जातो तसेच रंगपंचमीला रहाडींमधून रंग खेळला जातो.
_________
समभाव ही भावना एकमेकांच्या उत्कर्षासाठी असते परंतु त्यामुळे काही बाबींचा ऱ्हासही होतो. एखाद्या भागात अनेक ठिकाणांहून आलेले लोक रहात असतील तर त्यांचे उत्सव एकमेकांवर अतिक्रमण करतात. याचे जिवंत उदाहरण म्हणजे होळी. नामसाधर्म्यामुळे होळी सणाला आता बऱ्याच अंशी ‘होली’चे स्वरूप येत चालले आहे किंबहुना होळी ही पुरती ‘होली’ बनून गेली आहे. सध्या तरी आजुबाजूला तसेच चित्र पहावयास मिळते. नाशिक मात्र उत्सवांच्या बाबतीत अद्यापही सहीसलामत आहे. येथील रहाडी, दाजिबा वीर, वीरांची मिरवणूक, होळीचा माहोल याला एक वेगळीच चमक आहे.
पारंपरिक उत्सवांनी एकमेकांवर अतिक्रमण केल्याने पूर्वापार चालत आलेल्या अनेक रूढी परंपरांशी उत्सवांची फारकत होऊ लागली आहे. तसे पाहता होळी, धुळवड (धुलीवंदन) व रंगपंचमी हे तीन वेगवेगळे उत्सव आहेत. होळी म्हणजे अमंगलाचा नाश, धुळवड म्हणजे तीव्र उन सहन करण्याची शक्ती देणारा दिवस आणि रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव. परंतु दरम्यानच्या काळात झाले काय की अनेक संस्कृतीचे लोक एकत्र येऊन राहू लागले व त्यांचे सण समारंभ त्यांच्या पध्दतीने साजरे करू लागले. उत्तरभागातून आलेले अनेक लोक त्यांच्या ‘होली’ची तुलना आपल्या होळीशी करू लागले व होळीच्या दिवशीच होली म्हणजे त्यांची रंगपंचमी साजरी करू लागले. याला आधार मिळाला तो होळीच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या आपल्या धुळवडीमुळे. आदल्या दिवशी पेटवलेल्या होळीची राख धुळवडीच्या दिवशी अंगाला फासण्याची आपली पूर्वापार परंपरा आहे. राख फासल्याने कमीपणा येतो म्हणून आणि उत्तरेकडील लोक यादिवशी त्यांची ‘होली’ खेळत असल्याकारणाने धुळवडीला रंग खेळण्याची परंपरा जोर धरू लागली. आजही अनेक भागात धुळवडीच्याच दिवशी ‘होली है’ म्हणत मराठी बांधव रंग खेळू लागले. म्हणजेच नामसाधर्म्यामुळे होळीच्या दिवशीच होली (रंगपंचमी) साजरी करण्याचा प्रघात पडला. याचा प्रतिकूल परिणाम असा झाला की येथील लोक होळी खेळली का? होळी है, अशा ललकाऱ्या देऊ लागले. होळी व ‘होली’चा काला होऊन रंगपंचमीपर्यंत चार-पाच दिवस रंगांचा हा उत्सव खेळला जाऊ लागला.
मूळात होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. लाकडांची रास करून ती जाळतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा, चांगल्याचा, उदात्ततेचा स्विकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे. या उत्सवाला ‘होलिकादहन’ किंवा ‘होळी’, ‘शिमगा’, ‘हुताशनी महोत्सव’, ‘दोलायात्रा’, ‘कामदहन’ अशी वेगवेगळी नावे आहेत. त्यामागे काही धार्मिक कथाही आहेत. भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन जाळात उडी मारणारी होलिका ईश्वराच्या सामर्थ्यामुळे जळून खाक झाली ही ती कथा व त्या होलिका शब्दाचा झालेला अपभ्रंश म्हणा किंवा उच्चारामुळे झालेला बदल म्हणा ‘होळी’ असा शब्द निर्माण झाला असावा असा तर्क बांधण्यात येतो. खरं म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी त्या शांत झालेल्या होळीची राख अंगाला का लावायची तर पुढे सुरू होणारा कडक उन्हाळा आपण सहन करू शकू यासाठी. त्याला आपल्याकडे धुळवड संबोधण्यात येते. हा चांगला विचार अंगाला चिखल लावायचा, घाण पाणी, एकमेकांच्या अंगावर टाकायचं या आणि अशा ओंगळ कृतीमुळे मागे पडला. मग या दिवशी रंगच का खेळू नये या वृत्तीतून रंगांच्या उत्सवावर अतिक्रमण झाले. धुळवडीलाही रंग खेळण्याची परंपरा सुरू झाली. रंगपंचमी हा तर रंगांचाच उत्सव तो होळीनंतर लगेचच दोन-चार दिवसांनी येतो.  त्यादिवशी एकमेकांच्या अंगाला रंग लावून खेळाचा आनंद घेतला जातो. अंगाला रंग लावण्यामागे अशी भावना आहे की जितका जास्त रंग खेळाल तितके ऊन कमी लागते. त्यातूनच मग पाण्याचा कमी वापर करावा, इको फ्रेण्डली रंगपंचमी साजरी करावी, नैसर्गिक रंगांनाच प्राधान्य द्यावे वगैरे बाबी प्रामुख्याने आल्या. परंतु सर्वात जास्त गोंधळ झाला तो होळी, धुळवड आणि रंगपंचमी या तिघा उत्सवांची सरमिसळ झाल्याने. गेल्या काही वर्षांपासून बेमालूमपणे हे झाल्याने उत्सवांच्या या अतिक्रमणांचे वाटावे तेवढे वाईट हे थोडेच आहे.
‘होळी’ या एका शब्दापाशी हे उत्सव येऊन खिळले आहेत का याचा विचार करण्याची आता गरज निर्माण झाली आहे. होळी शब्दाशी जवळीक साधणारा ‘होली’ हा शब्द असल्याने असे झालेय का हे ही तपासून पाहताना मूळ होळी संकल्पनेपासून आपण दूर तर जात नाही ना याकडे गांभीर्याने पाहण्याचीही वेळ आलेली आहे.



शनिवार, २६ मे, २०१८

गोदातरंग


गोदातरंग 
परवा एका कार्यक्रमानिमित्ताने गोदाकाठी जाणं झालं. कधीही गेलं तरी गोदा प्रसन्नच असणार यात नवल नाही. सायंकाळची वेळ होती, ही कातरवेळ मोठी मगेशीर असते. यावेळी नाही नाही ते आठवतं. अशाच आठवणींचा पुंजका समोर घेऊन बसलेलं असताना घरात गांजलेल्या दोन मायलेकी आल्या. दोघीही एकमेकींची खुप काळजी घेत होत्या. पायऱ्यांवर बसल्या. ‘हळूच आई’ म्हणत लेकीने तिला हात दिला. आईला व्यवस्थित बसवून दिलं. एका पायरीवर ती मुलगी बसली. घरात काय चालतं यावर दोघींचं गंभीर बोलणं चाललं होतं, थोडा त्रागा असल्याने ते कानी पडत होतं. बाबांनी समजावून घ्यायला पाहिजे, त्यांनी असं नको वागायला वगैरे. आई मुलीची समजूत घालत होती मुलगी आईच्या पाठीवरून मायेने हात फिरवत होती. ‘किती काळजीनं करतेस तू साऱ्यांचं’. ‘माझं जाऊ दे, तू सांग’ असा त्यांचा संवाद रंगात येत असतानाच गोदा जीवाचे कान करून ऐकत होती. तिलाही माहेरवाशिन पोरगी काठावर येऊन दु:ख सांगत असल्यानं ती सुखावली असणारच. एकमेकींचे अश्रु पुसत असतानाच मुलीने विणलेल्या जुन्या पिशवीतून एक स्टीलचा डबा काढला. त्यातून तिने चक्क भजी काढली. एकमेकींचे सुखदु:ख सांगताना आपण घरून बनवून आणलेलं काही खायला पाहिजे, ते ही गोदाघाटी आणून खायला पाहिजे ही भावना ‌किती छान आहे. त्या दोघांचं फार कौतुक वाटलं. त्या रडत होत्या, एकिकडे खाणंही सुरू होतं. थोऽऽऽडं नजरेसमोर आणा...सूर्य बुडालाय. गोदा पिवळसर केशरी प्रकाशात न्हाऊन निघालीय, वटवाघळांचे थवेच्या थवे देवमामलेदार मंदिराहून उडताहेत. मंदिरांमध्ये घंटांचे नाद होताहेत, आरत्या सुरू आहेत. एकिकडे कुणाचा स्नानसंध्या करण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे गोदेला दिवे वाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे. या वातावरणात मायलेकींचा हा खाणसंवाद सुरू आहे. जरा चक्कर टाकण्याचं मन झाल्याने रामकुंडाकडे प्रयाण केलं तर जागोजागी कुटुंबच्या कुटुंब बसलेली. कुठे भत्ता खाण्याचं काम सुरू, कुठं पाणीपुरी तर कुठं घरून आणलेलं जेवण. गोदावरी ही आम्हाला लाभलेली देणगीच आहे. ती कुणाची नाही. तिच्या आश्रयाला आख्खा भारत येऊन राहतो. कधी नाशिकला येणं झालं तर सायंकाळी येथे एक फेरफटका मारायलाच हवा. सराफ बाजारातून जेव्हा आपण गोदेवर प्रवेश करतो तेव्हा क्षणात अलौकीक काहीतरी वाटून जातं. ती मंदिरं, ती छोटी समाधीस्थळं, ती साधुंची वस्ती, ती स्वयंपाकाची जागा. काय नाही गोदेवर. संसारच्या संसार उभे आहेत. गाडगेबाबा पुलावरून उजव्या बाजुला आध्यात्मिकतेचा हा पसारा तर डाव्या बाजुला प्रापंचिक माणसांचे जथ्थेच्या जथ्थे दिसतील. शेण्या विकणारे. वाळू विकणारे, माती विकणारे या बाजुला असतात. गाड्या धुण्याचा कार्यक्रम येथेच चालतो. उजवी बाजु सुक्ष्मतेकडे नेणारी तर डावी बाजु जडत्त्वाकडे नेणारी. पण काहीही म्हणा गोदावरी प्रचंड आहे. तिच्या वळचणीला खुपजण आहेत. त्यांना तगायचंय म्हणून आहेत, त्यांना गब्बर व्हायचंय म्हणून आहेत. नीळकंठेश्वराचं मंदिराकडे आपण जातो तेव्हा तेथे भल्या संध्याकाळीही जोतिषांची पंगत बसलेली असते. लोक म्हणतात, त्यांना भविष्य कळतं तर ते तिथं का बसले असते. पण बघा, जेव्हा एखादा गांजलेला तरूण त्यांच्याकडे जाऊन हात पुढे करतो तेव्हा हा त्यांच्यासाठी देवाहून कमी नसतो. त्यांच्याच शेजारी मुळ्याजाळ्या विकणारेही असतात. हे मुळं नक्की काय असतात कुणाला ठाऊक. श्रध्दा अंधश्रध्दा या वादात पडायचं नाही. परंतु त्यांच्या सांगण्याला काही तरी अर्थ असेलच ना. असो तर गोदा सर्वांनाच शरण देणारी आहे.
आता या मायलेकींचं खाणं संपत आलंय. त्यांच्या गप्पाही थांबलेल्या आहेत त्या दोघी शांत आहेत. केवळ पाण्याचा खळखळाट अनुभवताय. त्यांना आता एकमेकींशी काही बोलायचं नाही. गोदेत पडणारी वर्तुळ पाहण्यात त्या मग्न आहेत. पोरासोरांचं खाणंही संपलंय. त्यांनी कागदाची होडी बनवून गोदेत सोडलीय. ती ही खुश आहे. तिला प्रदुषणाची चिंता नाही हो! तिला तो पोरखेळही वाटत नाही तिला त्यांच्या भावना जपायच्याय अन् ती त्याच्याकडेच लक्ष देतेय. गोदा आता शांत आहे. दुरवरून सूर येताहेत...अरेच्चा हे तर जगजीतचे सूर आहेत. ‘ये दौलत भी ले लो...ये शोहरत भी ले लो’

रविवार, २६ मार्च, २०१७

नाथपंथी माधवनाथ महाराज





अवलियांचे जनस्थान : प्रशांत भरवीरकर
----
नाथपंथी माधवनाथ महाराज
वयाच्या दहाव्या वर्षी शैली, शृंगी, कौपिन धारण करणारे, माधवनाथ महाराज नावाचे मोठे अवलिया जनस्थानी होऊन गेले. माधवनाथ महाराजांचे आयुष्य अनेक चमत्कारांनी भरलेले आहे. धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. परमहंस माधवनाथ महाराज, शिर्डीचे साईबाबा, पळुशीचे श्री धुंडीराज महाराज, शेगावचे श्री गजानन महाराज व नाशिकचे गोपालदास महाराज यांना अवलियांमध्ये पंचायतन मानण्यात येते. या पाचही जणांचे सूत्र एकमेकांच्या अंत: शक्तीने चालत, असे मानले जाते.
----
नाशिकचे नरसिंग उर्फ गोपालदास महाराज ज्यांना आपले वडील बंधू म्हणून पुकारत ते माधवनाथ महाराज मूळात नाथपंथी होते. त्यांच्याकडे नाथपंथाची चित्रकुटची गादी होती. ‘अवलियांचे जनस्थान’ या शृंखलेत यापूर्वी माधवनाथ महाराजांचा उल्लेख आलेला आहे. ते सिन्नर तालुक्यातील पांगरी या गावचे. नाशिकला गोदातिरावर त्यांचा वास होता. येथे अनेक मुमुक्षुंना ज्ञान देऊन त्यांनी सज्ञान केले. गोदातिरी ते गंगागिरी महाराजांच्या सान्निध्यात रहात. माधवनाथ महाराज अज्ञातवासात असल्याने त्यांनी आपले खरे स्वरूप अनेक दिवस प्रकट केले नाही. ते गोदातिरी आपल्याच मस्तीत रहात. कालांतराने त्यांना अज्ञातवास तोडण्याचे संकेत मिळाले तेव्हा त्यांनी लक्ष्मीनारायण मंदिरात देवाच्या साक्षीने अज्ञातवास संपवला आणि एका अवलियाचे दर्शन जनस्थानवासियांना झाले.
अज्ञातवास संपविल्यावर माधवनाथ महाराज काळाराम मंदिराच्या पूर्व द्वारावर अखंड धूनी पेटवून राहणाऱ्या गोपालदास महाराजांच्या भेटीला गेले. गोपालदास महाराज मौनी म्हणून प्रसिध्द होते, आता हे दोघे साधू एकमेकांशी कसे बोलतात हे पाहण्यासाठी भक्तांची गर्दी जमली तर माधवनाथ महाराजांना पहातच गोपालदास मांडी थोपटू लागले. त्यांना प्रत्युत्तर म्हणून माधवनाथ महाराजांनीही मांडी थोपटली. दोघांनाही शड्डू ठोकले, एकमेकांना वाकुल्या दाखवल्या आणि परस्परविरूध्द दिशांना निघून गेले. या पंचायतनाचे सूत्र अंत:शक्तीने चालत हा अनुभव भक्तांना पुन्हा एकदा आला. एकदा तर रामनवमीच्या दिवशी माधवनाथ महाराज गोपालदासांना भेटावयास गेले असता त्यांना कडेवरच उचलून घेतले. नाथांनी त्यांच्या हृदयास आपला कान लावला. संभाषण काहीच नाही. असे हे सूत्र होते.
माधवनाथ महाराज लहान असताना त्यांच्या आई मथुरादेवी त्यांना घेऊन साधू देवमामलेदार यांच्या भेटीला आल्या तेव्हा देवमालेदारांनी त्यांना दुरूनच येताना पाहून ‘हा तर गादीचा मालक माझ्या घरी चालून आला आहे.’ असे उदगार काढले. मथुरादेवींनी देवमामलेदारांना वंदन केले, त्यांनी लहानग्या माधवला उचलून घेतले आणि ‘बाळाचे रक्षण करावे, हा उज्जैयनीचा प्रसाद आहे,’ असे सांगितले त्यावर आई मथुरादेवी यांना माधवच्या जन्माची आठवण झाली.
किशोरवयीन अवस्थेत त्यांचे वास्तव्य अवंती नगरीत होते, तेथे त्या महाकाळाची पूजा करीत. एकदा श्रावणी सोमवारी त्या महाकाळाची पूजा करून ध्यानस्थ बसल्या असता जटाधारी, अंग भस्मांकित, कासे लंगोटी व तेजोवलयांकित असा पुरूष तेथे आला आणि शिवशंकराची पिंड पुजनास देत ‘तू चतुर्सिध्द माता होशील’ असा आशीर्वाद देऊन चालता झाला. पुढे विवाहानंतर गर्भवती असताना त्या चित्रकुट येथे बंधुंच्या भेटीला गेल्या असता, त्यांचे बंधू विठ्ठलनाथ यांनी त्यांना काही दिवस तेथेच ठेवून घेतले. विठ्ठलनाथ हे महायोगी होते. केवळ दुर्वांचा रस प्राशन करून त्यांनी तपाचरण केले होते. त्यांच्या मठाखाली एक मोठी गुंफा होती. तेथे आदिनाथांची समाधी असून नाथांचे ते मूळस्थान म्हणून प्रसिध्द आहे. नाथांचे मोठे मंदिर स्थापन करून विठ्ठलनाथ येथे रहात असत. मथुरादेवी अशा पावन ठिकाणी असताना दिवसभर पूजेत मग्न रहात असत. तो दिवस होता, शके १७७९. चैत्र शुध्द प्रतिपदा. २६ मार्च १८५७. सूर्योदयाच्या समयी व्यंकटेश बालाजीस प्रदक्षिणा घालत असताना त्यांना प्रसूती कळा जाणवू लागल्या. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले, मोठ्या आनंदाने विठ्ठलनाथांनी त्याचे नाव माधव ठेवले.
क्षणार्धात मथुरादेवींना हा काळ डोळ्यासमोर झळकला. देवमामलेदारांनी आठवण करून देताच मथुरादेवींना हा देवाचा प्रसाद असल्याचे जाणवले. पुढे देवमामलेदारांनी सांगितले की आता पुन्हा चित्रकुटाचे बोलावणे येणार आहे, तेव्हा तेथे जाऊन जे काही मिळेल त्याचा स्वीकार करावा. पांगरीला परतल्यावर लगेचच माधव यांना चित्रकुटाचे बोलावणे आले. विठ्ठलनाथांची गादी रिकामी झाली असल्याने तेथे कुणास बसवावे अशा विचारात सर्वजण असताना चिठ्ठया टाकण्यात आल्या आणि त्यात लहानग्या माधवचे नाव निघाले. त्यामुळे त्यांना तातडीने चित्रकुटास बोलाविण्यात आले होते. अशाप्रकारे वयाच्या केवळ दहाव्या वर्षी माधवचे माधवनाथ महाराज झाले. पुढे माधवनाथ महाराज चित्रकुटला शैली, शृंगी, कौपिन धारण करून नाथवेषात सदैव आपल्याच मस्तीत रहात. भोजनाची शुध्द नाही, कधी उपवास तर कधी दुग्धपान करीत. ते नाथपंथी असूनही त्यांच्या गळ्यात कायम तुळशीची माळ असे. पुढे माधवनाथांची दत्तक जननी ठकुबाई हिने त्यांच्या विवाहाचा धोशा लावला मात्र माधवनाथ महाराजांना विवाह पसंत नसल्याने त्यांनी स्थानत्याग केला आणि भारत दर्शनासाठी निघाले. नाथांची सर्व ठिकाणे फिरल्यावर बारा वर्षांनी ते येऊन पुन्हा चित्रकुटास आले. मात्र तेथे चमत्कार करण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांची दत्तक जननी ठकुबाई हिने त्यांना अज्ञातवासात राहण्याचा आदेश केला. त्यानुसार माधवनाथ महाराज कासे लंगोटी लावून निघाले. पुढे ते पिशाच्चवृत्ती धारण करून फिरत राहिले. इंदूरहून महूस, तेथून धारानगरीस, खांडव्यास, तेथून चाळीसगावास आले. पोहेरगावी असताना रंभा पाटील यांच्याकडे धोंड्या नावाने राहू लागले. तेथे ते शेताची राखण करीत. मात्र एकदा हरिभजनात मग्न असताना एका मस्तवाल बैलाने शेताची नासधूस करून टाकली. पाटलीन बार्इंनी त्यांना भलेबुरे ऐकवले तेव्हा ‘५२ मण गहू पिकतील’ असे सांगून गावाबाहेर जाऊन राहिले. त्याप्रमाणे तितके गहू पिकताच पाटील त्यांना घ्यायला परत आले, मात्र ते गेले नाही. पुढे येसगाव नावाच्या खेडगावी ते राहिले. तेथे ते लहान मुलांना शिकविण्याचे काम करीत. तेथे त्यांच्या विवाहाचा विचार गावकऱ्यांनी केल्याने तेथून निघून ते रोझे गावी आले. येथे जर्जरी जरबंक्ष नावाचे नाथांचे ठिकाण आहे. येथे भिकनशावली नावाचे एक फकीर रहात त्यांना भेटताच माधवनाथ महाराजांना अंतरीची खूण पटली आणि त्यांनी भिकनशावली यांना कडकडून मिठी मारली. तेथून ते पांगरीला आले. पांगरीला काही दिवस मुक्काम करून लासूर गावी गेले. येथे गंगागीर महाराज म्हणून मोठे हरिभक्त होते. लाक्षायणी देवीच्या मंदिरात भजन सुरू असताना गंगागीर महाराज माधवनाथ महाराजांच्या पायी लागत ‘हा दिव्य सत्पुरूष आहे’ असे सांगू लागले मात्र माधवनाथ महाराजांनी त्यांना अज्ञातवासाच्या व्रताची आठवण करून दिली.
काही दिवसांनी माधवनाथ महाराज सप्तशृंग गडावर आले. येथेही त्यांनी अनेक चमत्कार केले. दोन महिने गडावर वास्तव्य केल्यावर नाशिकला गोदातिरी आले आणि अज्ञातवास तोडण्याचे संकेत मिळताच लक्ष्मीनारायण मंदिरात देवाच्या साक्षीने अज्ञातवास संपवला. नाशिकला असताना सार्वजनिक सुखप्राप्तीसाठी त्यांनी विद्वानांकरवी सप्तशती ग्रंथाचे पाठ करून सात दिवस यज्ञ केला. पुर्णाहूतीच्या दिवशी नाथांनी तुपाची धार यज्ञकुंडात धरली असता त्यातून मोठ्या ज्वाळा प्रकटून गगनाला भिडलेल्या लोकांनी प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. याच यज्ञात त्यांनी साडी चोळी अपर्ण केली, यज्ञ संपल्यावर ती न जळता तशीच्या तशी निघाल्याची आख्यायिका आहे. नाशिकला त्यांचा हरिसिंग नावाचा मोठा भक्त होता. त्याच्या घरी ते बसत, तेथे मुमुक्षु त्यांना प्रश्न विचारण्यासाठी येत असत. एकदा सुकेणेकर जहागिरदार नाथांच्या भेटीस आले, घरी चोरी झाल्याचे वृत्त त्यांना सांगितले तेव्हा एकवीस दिवसात चोर स्वत: घरी येईल. असे सांगून माधवनाथ महाराजांनी समाधी लावली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दागिने चोरांनी स्वत:हून आणून दिले. याच हरिसिंगांच्या घरी एकदा एकादशीच्या दिवशी महाराज कीर्तन करीत असताना काळ्या वर्णाची ठेंगणी मूर्ती असलेला एक तापसी त्यांच्याजवळ येऊन बसला. नाथांनी खुणेनेच हरिसिंगाच्या मुलाला दर्शन घेण्यासाठी सांगितले तर क्षणार्धात मूर्ती अंतर्धान पावली. (असा उल्लेख माधवनाथ महाराजांच्या पोथीत आहे.) प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर माधवनाथ महाराजांना पळसे गावाहून आमंत्रण आले. तेथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तो काळ होता १९०१. या नामसप्ताहात पळसे गावाला पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते. दहा हजाराहून अधिक भजनी मंडळी स्वत:हून तेथे आली. माधवनाथ सतत नामस्मरणात राहिले. सतत अन्नदान सुरू होते. येथे दर्शनार्थी इतके झाले की नाथांचे पाय सुजून गेले. शेवटी भक्तांनी त्यांना एका मोठ्या झाडावर उच्च आसन करून तेथे बसवले व दर्शनार्थींना दुरून दर्शन घेण्याची विनंती केली, अशी आठवण सांगितली जाते. या ठिकाणी त्यांनी जानोरी (ता. दिंडोरी) येथील त्यांचा शिष्य काशिनाथ शिंपी यास योगक्रिया शिकवली. त्यानंतर अनेक दिवसांनी ते पांगरीस आले. तेथे एका उकीरड्यावर बसून ध्यानावस्थेत गेले व जमलेल्या लोकांना म्हणाले. चित्रकुट येथील व्यंकटेशाचे प्रतिमंदिर येथे व्हावे, असे वाटते. मग काय लोक कामाला लागले. पांगरीस असलेले श्रीविष्णुचे मंदिर ही चित्रकुटची प्रतिकृती आहे. तेथून माधवनाथ महाराज पुण्यास गेले. त्यानंतर ते पुन्हा नाशिकला आले असता भगूर येथील भिकूशेठ या गृहस्थाला सज्ञान केले.
माधवनाथ महाराज खऱ्या अर्थाने लोकनायक होते. लोकांचे दु:ख, पीडा त्यांनी दूर केल्या. एकनाथ षष्ठी, १४ मार्च १९३६ रोजी हिंगणघाट (जि.वर्धा) येथे त्यांनी देह ठेवला. त्यांच्या आज्ञेनुसार इंदूरला त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. अशा या माधवनाथ महाराजांची प्रतिमा नारोशंकर मंदिराच्या पूर्वेस असलेल्या नरसिंग महाराजांच्या समाधी मंदिरात लावण्यात आली आहे. या पंचायतनाची भक्त मनोभावे पूजा करतात.
________                

  मार्केटचे दिवस मार्केटचे ते दिवस छान होते. सायंकाळचे पाच वाजलेले. भाजीने भरलेला टेम्पो घेऊन, त्या घमघमणाऱ्या सुगंधात मधोमध उभा राहून मी मा...