अवलियांचे जनस्थान
-----------
दलदलीत राहणारे गोपालदास महाराज
गोपालदास महाराज काही विक्षिप्त शब्दांचा उच्चार करीत असत. त्यांची भाषा
व बोलण्यातील रहस्य सर्वसामान्य माणसाला समजण्यापलिकडे होते. हातवारे, खाणाखुणा व भाषा
याचे रहस्य हे फक्त त्यांचे निकटवर्तीय वंदनीय श्री माधवनाथ महाराज हेच जाणीत. माधवनाथ
महाराजांना ते मोठे बंधू म्हणत असत. परमहंस शिलनाथ महाराज, शिर्डीचे साईनाथ महाराज,
पळुशीचे श्री धुंडीराज महाराज, शेगावचे श्री गजानन महाराज व नाशिकचे गोपालदास महाराज
यांना अवलियांमध्ये पंचायतन मानण्यात येते. या पाचही जणांच्या अंत: शक्तीने एकमेकांचे
सुत्र चालत असत.
----------
गोपालदास उर्फ नरसिंग महाराज हे परमहंस योगी नाशिक येथे कोठून, केव्हा
व कसे आले हे सर्व अज्ञात आहे. नाशिकच्या गोदावरीकाठी भाट्यांची धर्मशाळा होती या धर्मशाळेच्या
पाठीमागील बाजूस आळवांची बाग होती. तेथे सतत दलदल व चिखल असे या दलदलीत गोपालदास महाराज
पहुडलेले सर्वप्रथम लोकांनी पाहिले. हा कोणीतरी वेडसर मनुष्य आहे असा लोकांचा समज होता
परंतु ते दृष्यही केविलवाणे होते त्यामुळे त्यांना कुणी चिखलातून बाहेर काढीत, बाजूला
बसवित. ते पुन्हा त्या चिखलात जाऊन पहुडून घेत. लोकांनी त्यांना चिखलातून बाहेर काढावे
आणि त्यांनी जाऊन पुन्हा चिखलात पडून घ्यावे असा दिनक्रम कित्येक दिवस सुरू होता. कधी
कधी त्यांच्याभोवती सर्प वेटोळे घालून बसलेले असत तर कधी त्यांच्या अंगावर नाग खेळत
असताना दिसे. त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून दिवसा नाग त्यांच्या डोक्यावर फणा
धरून उभे रहात असत असे अनेकांनी पाहिले आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस कुणीही
करीत नसत. जवळजवळ तीन वर्षे ते याच अवस्थेत होते. लोकांनी यावे पहावे, पुढे जावे. काहींनी
त्यांना चिखलातून बाहेर काढावे यांनी पुन्हा चिखलात जावे असे सत्र सुरूच राहिले. डोक्यावर
केस अस्ताव्यस्त व वाढलेले, लांबसडक दाढी, अंगावर कपडे नाहीत. ते दिगंबर अवस्थेत असताना
त्यांना कित्येकांनी लंगोट नेसवावे, ती ही ते काढून फेकायचे. एकदा नाशिकमधील महान विभूती
नांदगावकर यांनी नरसिंग महाराजांना त्या अवस्थेत पाहिले. नांदगावकर हे अध्यात्मातील
अधिकारी व्यक्ती होते. त्यांनी तात्काळ ताडले की हे साधेसुधे, वेडसर सत्पुरूष नसून
विदेही अवस्थेतील महान सतपुरूष आहे. त्यांनी या सत्पुरूषास दलदलीतून काढून राममंदिरात
नेऊन बसविण्याचा निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांनी या अवलियास चिखलातून काढून पवित्र
गोदावरीच्या काठी रामकुंडावर नेऊन गोदामातेच्या जलाने सन्मानपूर्वक स्नान घातले. व
राममंदिराच्या पूर्व दरवाजाच्या ओसरीवर आणून उभे केले. लोकांनी अन्न आणून द्यावे तर
ते खात नसत. कधी कोणी घास भरविला तर थोडेसेच खात असत. ते कुणाशीही बोलत नसत. दीड वर्षांपर्यंत
ते राममंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ उभे होते. दीड वर्षांनंतर त्यांनी बैठकीचा नियम केला.
तेव्हापासून त्यांनी धुनी ठेवण्याचा क्रम ठेवला. काही विक्षिप्त शब्दांचा ते उच्चार
करीत असत. त्यांची भाषा व बोलण्यातील रहस्य सर्वसामान्य माणसाला समजण्यापलिकडे होते.
हातवारे, खाणाखुणा व भाषा याचे रहस्य हे फक्त त्यांचे निकटवर्तीय वंदनीय श्री माधवनाथ
महाराज हेच जाणीत. माधवनाथ महाराजांना ते मोठे बंधू म्हणत असत परमहंस शिलनाथ महाराज,
शिर्डीचे साईनाथ महाराज, पळुशीचे श्री धुंडीराज महाराज, शेगावचे श्री गजानन महाराज
व नाशिकचे गोपालदास महाराज यांना अवलियांमध्ये पंचायतन मानण्यात येते. या पाचही जणांच्या
अंत: शक्तीने एकमेकांचे सुत्र चालत असत.
गोपालदास महाराज नेहमी ॐ नरसिंग या मंत्राचा जप करीत त्यामुळे पुढे त्यांना
नरसिंग महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. ते बसत असलेल्या समोरच्या खांबास त्यांनी आपल्या
ध्यानदेवतेचे अनुष्ठान केले होते. या खांबास ते कोणालाही टेकून बसून देत नसायचे. त्यांना
गोरेसू गांजा व साधा गांजा ओढण्याची सवय होती. ‘हे तो माप मापना है’ असे त्यांचे नित्य
वचन असे कारण ते व्यसन नव्हते तर नुसताच देखावा होता.
शेगावचे गजानन महाराज यांना गोपालदास महाराज पूजनीय मानत एकदा गजानन महाराज
नाशिकला येणार होते तेव्हा सकाळपासून गोपालदास महाराज आज माझा बंधु गजानन र्वहाडातून
येणार आहे असे ते सारखे म्हणत होते. त्याप्रमाणे गजानन महाराज काळाराम मंदिरात त्यांच्या
दर्शनाला आले. गोपालदास महाराजांनी त्यांचा आदरसत्कार केला. त्यांना नारळ, खडीसाखर,
फुले अर्पण केली. तेथून पूर्व दरवाजाने मंडळींच्या घोळक्यासह महाराजांच्या मठात येऊन
समोर पिंपळाच्या पारावर अर्धा तास बसले. ते उभयता एकमेकांशी काय पुटपुटले हे कोणालाही
समजले नाही. साधुची खुण साधूच जाणे, इतरांना ते अगम्य होते.
श्री माधवनाथ महाराजांची स्वारी नाशिकला आली की ते गोपालदास महाराजांची
भेट घेत श्री माधवनाथ महाराज श्रीराम मंदिरात आल्यावर या दोघांची गुप्त भाषेत काहीतरी
देवाणघेवाण होत असे. कधी दंड थोपटणे, कधी मुखातून मोठ्याने आवाज काढून वाकुल्या दाखवणे,
कधी एकमेकांना कडकडून मिठी मारणे असेल प्रकार ते करीत असत.
गोपालदास महाराजांची एक आठवण श्री साईचरित्रात अध्याय ३३ मध्ये सारांशने
आलेली आहे. सन १९१७ मध्ये गुरूपौर्णिमेला डहाणूचे हरिभाऊ कर्णिक शिर्डीला साईबाबांच्या
भेटीला गेले होते. दर्शन झाले, पाद्यपुजा झाली आणि दक्षिणा देऊन हरिभाऊ द्वारकामाईची
पायरी उतरून निघाले. मात्र त्यांना अचानक वाटले की साईबाबांना आणखी एक रूपया दक्षिणा
द्यावी परंतु एकदा बाबांनी दर्शन दिल्यावर पुन्हा जाणे उचित नाही असे समजून आपली इच्छा
मनाशी दाबून टाकत ते निघून आले. पुढे काही दिवसांनी त्यांचे नाशिकला येणे झाले. ते
नाशिकला श्रीकाळाराम मंदिरात गोपालदास महाराजांच्या दर्शनासाठी आले असता त्यांना पाहताक्षणी
गोपालदासांनी आसनावरून उठून जात त्यांचा मणिबंध पकडला आणि ‘माझा रूपया देङ्क असे म्हणाले.
त्यांच्या अंतर्यामीपणाचे हरिभाऊंना नवल वाटले. संकल्पाचा रूपया सतपुरूष संकेताने स्विकारतात
याबद्दल ही आख्यायिका सांगितली जाते.
गोपालदास महाराज यांचे प्राणीमात्रावर फारच प्रेम होते. गायल कुत्रे,
पोपट, कबूतर त्यांना फार प्रिय होते. असे कित्येक प्राणी त्यांच्या मठात होते. त्यांनी
शेवटपर्यंत गाईची सेवा केली. एकदा तर पावसाळ्यात गोदावरीला महापूर आलेला होता गोदावरी
पात्रातील नारोशंकर मंदिराच्या कळसावर एक माकड अडकून पडले होते. आता काय करावे या विवंचनेत
लोक असताना गोपालदास महाराज लिलया पाण्यावरून चालत गेले आणि माकडाला वाचवले अशी आख्यायिका
सांगितली जाते. १३ फेब्रुवारी १९२० माघ वद्य दासनवमी, शके १८४१ पहाटे सव्वा चार वाजेच्या
ब्रह्ममुहुर्तावर काळाराम मंदिराच्या पूर्वदरवाजात ध्यानयोगी परमहंस गोपालदास महाराज
समाधी अवस्थेतच ब्रह्मत्त्वात विलीन झाले. असे म्हणतात की, त्यावेळी त्यांचे आसन जमिनीपासून
सव्वा हात उंच झाले होते. महाराजांच्या प्राणोत्क्रमणाच्यावेळी त्यांच्याजवळ जे होते
त्यांनी लिहून ठेवले आहे की, महाराजांनी समाधी लावली तेव्हा घारीसारखा मोठा पोपट काळाराम
मंदिराच्या कळसावर येऊन घिरट्या घालत होता. समाधीप्रसंगी हा पोपट उफराटा होऊन अंगणात
पडला आणि बघता बघता अदृश्य झाला.
परमहंस श्री गोपालदास महाराज यांची समाधी त्यांनी निर्देशित केलेल्या
जागेत म्हणजेच लक्ष्मणरेषा वाघाडी गोदावरी व सरस्वती या त्रिवेणी संगमातील एका मोठ्या
खडकावर आहे. नरसिंग महाराज सेवा मंडळाने सन २००४ मध्ये या ठिकाणी भव्य समाधी मंदिर
उभे केले आहे. समाधीस्थानावर समाधी व पादुकांची नित्य स्नान पुजा धूप दीप आरती नैवद्य
सायंकाळची आरती असा दिनक्रम आहे. याशिवाय गुरूपौर्णिमा, त्रिपुरी पौर्णिमा, दीपोत्सव,
गुढीपाडवा, नववर्षारंभ व माघ वद्य दासनवमीला महाराजांच्या पुण्यातिथीचे औचित्य साधून
महाअभिषेक पालखी महाआरती महाप्रसाद असा कार्यक्रम असतो. अशा या अवलियाच्या आठवणीने
आजही जनस्थान कंपित होते.