सोमवार, १८ एप्रिल, २०२२

 मार्केटचे दिवस

मार्केटचे ते दिवस छान होते. सायंकाळचे पाच वाजलेले. भाजीने भरलेला टेम्पो घेऊन, त्या घमघमणाऱ्या सुगंधात मधोमध उभा राहून मी मार्केटला भाजी वोपण्यासाठी (म्हणजे विकण्यासाठी) जात असे. भाजी म्हणजे कोथिंबीर. पूर्वी जसे सगळे पेपर गांवकरी असत, सायकलला गाडी म्हणत व कोंबड्यांना पक्षी म्हणत तसेच मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू असा भेद नसे, सगळ्या पालेभाज्या या भाजी या एका कॅटेगरीखाली येत असत. तर भाजी घेऊन मी मार्केट गाठत असे. सोबत पोपट नावाचा ड्रायव्हर. पोपट हसतमुख होता, दोन चार शिव्या हासडल्या तरी ‘काय राव...’ म्हणून हसून द्यायचा म्हणून तर तो आमच्याकडे गडी म्हणून टिकला होता. (नंतर कळले या पोपटवर हाफमर्डरचा गुन्हा दाखल होता अन त्याला जेलमधून सोडवून डायरेक्ट मळ्यात कामाला आणले होते. हे कळल्यावर मात्र त्याच्यापासून चार हात लांबच बरे म्हणून त्याला मी माझ्यापुरते दूर केले.) गाडी मार्केटच्या वट्ट्याला (म्हणजे ओट्याला) लावली की भाज्यांचा झेल सुरू व्हायचा. दोन भाज्या झेलून त्याचे रिंगण करून ठेवावे लागत असत. त्यातही निलाव (म्हणजे लिलाव) आठ वाजेच्या पुढे हलला की हे रिंगण मोडून भाजी पसरून ठेवावी लागत असे कारण मध्ये भाजी रचून ठेवल्याने उष्मा निर्माण होत असे व मुंबईपर्यंत माल जाताना सडून जायला नको म्हणून ती पसरवण्यात येई. निलावाची पध्दत मोठी विचित्र, सगळे व्यापारी भाजी तुडवत उभी राहत, कुणी कचाकच पाय देत, तर कुणी इकडून तिकडे फेकत. ही भाजी मुंबईला माणसांना खाण्यासाठी पाठवायची आहे तर हे व्यापारी लोक असे का वागतात हा माझ्या किशोरवयाला प्रश्न पडत असे. अगदी कचऱ्याच्या भावाने ती विकली जाई. त्यावेळी किती पैसा मिळतो यापेक्षा आपला माल विकला गेला व आपण मोकळे झालो ही भावनाच खूप महत्त्वाची होती कारण व्यापाऱ्यांनी पडलेल्या भावात मागितलेली भाजी त्यांना द्यायची नाही तर परत घेऊन जाऊन तिचे करायचे काय असा सवाल असायचा. (त्यानंतर आपण आपला माल रस्त्यावर का फेकून देतो हे मला उमगायला लागले) सकाळपासून ताईने एवढ्या कष्टाने काढलेल्या भाजीचा असा कचरा होताना पाहून डोळ्यात पाणी यायचं पण पर्याय काहीच नसायचा. व्यापारी बोली लावून कागदाचा एक चिटुरा भाजीवर फेकून निघून जायचे. त्यानंतर सगळी भाजी भोतात (म्हणजे गोणी) भरून व्यापाऱ्याचे लोक घेऊन जात. यात व्यापारी जेवढे नाचले त्यापेक्षा जास्त हे लोक भाजीवर नाचत व सकाळी आम्ही या भाजीच्या जुड्या एखाद्या लहान बाळाला अलगदपणे आणावे तशा घेऊन आलेल्या असायचो आणि येथे मात्र तिचे हे हाल होत असत. भाजी एकदा व्यापाऱ्याच्या ताब्यात दिली की पैसे घेण्यासाठी लायनीत उभे राहायचे. चिटुरा खिडकीतून मध्ये सरकवायचा आणि माल उभा करेपर्यंत लागलेल्या पैश्याच्या निम्मे पैसे घेऊन आपण माल विकला या आनंदात मार्केट कमिटीच्या बाहेर यायचो. आता मजेचा पार्ट सुरू व्हायचा. पोपट व मला मार्केटला यायला का आवडायचे तर माल विकून झाल्यावर गोसावी बाबाच्या हॉटेलात गरमागरम दोन ब्रेड सँडविच आणि कढी खायला मिळायची. घमघमणाऱ्या काळ्याकुट्ट तेलात, अर्धे अधिक तळलेले ते दाळीच्या पिठातले ब्रेड आणि कढी याची सर आज कशालाच नाही. मार्केटचे ते दिवस छान होते. रात्रीची वेळ, सर्व भाज्यांचा एकत्र झालेला सुगंध, काकड्या, भोपळे, दोडके, कारले, गिलके, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो हे सारे आजूबाजूला कॅरेटच्या कॅरेट ठवलेले मेथी, पालक, शेपू, कांद्याची पात आजूबाजूला पसरवलेली. हॅलोजनचा पिवळा उजेड आणि खर्चाच्या निम्मेच मिळालेले पैसे घऊन घराकडे निघालेला मी. बाकी सारं स्तब्ध. आता ताई अंगणातल्या चुलीवर भाकऱ्या थापत असेल आणि चुलीतले निखारे बाहेर ओढून भाकरीला जाडसर पापुडा आणला असेल. शेजारी हिंदेलेमच्या पातेल्यात भात रटरटत असेल. वेलीवरून तोडलेल्या ताज्या गिलक्याची भाजी आणि जोडीला ताईच्या मायेसारखेच मुरलेले लोणचे. नाना बाजेवर रेडिओ लावून सिलोन ऐकत असलेले अन दादा पुस्तकात डोके खुपसून बसलेला. शहरात आल्यावर कळतं आपण काय हरवून आलोय. माणसे निघून जातात, भाजी विकायला गेलेलो मी तोच आहे पण स्थित्यंतरे किती. बेचाळीस वर्षात काय पायाखालून गेले काय सांगणार, किती सांगणार?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  मार्केटचे दिवस मार्केटचे ते दिवस छान होते. सायंकाळचे पाच वाजलेले. भाजीने भरलेला टेम्पो घेऊन, त्या घमघमणाऱ्या सुगंधात मधोमध उभा राहून मी मा...