शनिवार, २६ मे, २०१८

गोदातरंग


गोदातरंग 
परवा एका कार्यक्रमानिमित्ताने गोदाकाठी जाणं झालं. कधीही गेलं तरी गोदा प्रसन्नच असणार यात नवल नाही. सायंकाळची वेळ होती, ही कातरवेळ मोठी मगेशीर असते. यावेळी नाही नाही ते आठवतं. अशाच आठवणींचा पुंजका समोर घेऊन बसलेलं असताना घरात गांजलेल्या दोन मायलेकी आल्या. दोघीही एकमेकींची खुप काळजी घेत होत्या. पायऱ्यांवर बसल्या. ‘हळूच आई’ म्हणत लेकीने तिला हात दिला. आईला व्यवस्थित बसवून दिलं. एका पायरीवर ती मुलगी बसली. घरात काय चालतं यावर दोघींचं गंभीर बोलणं चाललं होतं, थोडा त्रागा असल्याने ते कानी पडत होतं. बाबांनी समजावून घ्यायला पाहिजे, त्यांनी असं नको वागायला वगैरे. आई मुलीची समजूत घालत होती मुलगी आईच्या पाठीवरून मायेने हात फिरवत होती. ‘किती काळजीनं करतेस तू साऱ्यांचं’. ‘माझं जाऊ दे, तू सांग’ असा त्यांचा संवाद रंगात येत असतानाच गोदा जीवाचे कान करून ऐकत होती. तिलाही माहेरवाशिन पोरगी काठावर येऊन दु:ख सांगत असल्यानं ती सुखावली असणारच. एकमेकींचे अश्रु पुसत असतानाच मुलीने विणलेल्या जुन्या पिशवीतून एक स्टीलचा डबा काढला. त्यातून तिने चक्क भजी काढली. एकमेकींचे सुखदु:ख सांगताना आपण घरून बनवून आणलेलं काही खायला पाहिजे, ते ही गोदाघाटी आणून खायला पाहिजे ही भावना ‌किती छान आहे. त्या दोघांचं फार कौतुक वाटलं. त्या रडत होत्या, एकिकडे खाणंही सुरू होतं. थोऽऽऽडं नजरेसमोर आणा...सूर्य बुडालाय. गोदा पिवळसर केशरी प्रकाशात न्हाऊन निघालीय, वटवाघळांचे थवेच्या थवे देवमामलेदार मंदिराहून उडताहेत. मंदिरांमध्ये घंटांचे नाद होताहेत, आरत्या सुरू आहेत. एकिकडे कुणाचा स्नानसंध्या करण्याचा प्रयत्न तर दुसरीकडे गोदेला दिवे वाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे. या वातावरणात मायलेकींचा हा खाणसंवाद सुरू आहे. जरा चक्कर टाकण्याचं मन झाल्याने रामकुंडाकडे प्रयाण केलं तर जागोजागी कुटुंबच्या कुटुंब बसलेली. कुठे भत्ता खाण्याचं काम सुरू, कुठं पाणीपुरी तर कुठं घरून आणलेलं जेवण. गोदावरी ही आम्हाला लाभलेली देणगीच आहे. ती कुणाची नाही. तिच्या आश्रयाला आख्खा भारत येऊन राहतो. कधी नाशिकला येणं झालं तर सायंकाळी येथे एक फेरफटका मारायलाच हवा. सराफ बाजारातून जेव्हा आपण गोदेवर प्रवेश करतो तेव्हा क्षणात अलौकीक काहीतरी वाटून जातं. ती मंदिरं, ती छोटी समाधीस्थळं, ती साधुंची वस्ती, ती स्वयंपाकाची जागा. काय नाही गोदेवर. संसारच्या संसार उभे आहेत. गाडगेबाबा पुलावरून उजव्या बाजुला आध्यात्मिकतेचा हा पसारा तर डाव्या बाजुला प्रापंचिक माणसांचे जथ्थेच्या जथ्थे दिसतील. शेण्या विकणारे. वाळू विकणारे, माती विकणारे या बाजुला असतात. गाड्या धुण्याचा कार्यक्रम येथेच चालतो. उजवी बाजु सुक्ष्मतेकडे नेणारी तर डावी बाजु जडत्त्वाकडे नेणारी. पण काहीही म्हणा गोदावरी प्रचंड आहे. तिच्या वळचणीला खुपजण आहेत. त्यांना तगायचंय म्हणून आहेत, त्यांना गब्बर व्हायचंय म्हणून आहेत. नीळकंठेश्वराचं मंदिराकडे आपण जातो तेव्हा तेथे भल्या संध्याकाळीही जोतिषांची पंगत बसलेली असते. लोक म्हणतात, त्यांना भविष्य कळतं तर ते तिथं का बसले असते. पण बघा, जेव्हा एखादा गांजलेला तरूण त्यांच्याकडे जाऊन हात पुढे करतो तेव्हा हा त्यांच्यासाठी देवाहून कमी नसतो. त्यांच्याच शेजारी मुळ्याजाळ्या विकणारेही असतात. हे मुळं नक्की काय असतात कुणाला ठाऊक. श्रध्दा अंधश्रध्दा या वादात पडायचं नाही. परंतु त्यांच्या सांगण्याला काही तरी अर्थ असेलच ना. असो तर गोदा सर्वांनाच शरण देणारी आहे.
आता या मायलेकींचं खाणं संपत आलंय. त्यांच्या गप्पाही थांबलेल्या आहेत त्या दोघी शांत आहेत. केवळ पाण्याचा खळखळाट अनुभवताय. त्यांना आता एकमेकींशी काही बोलायचं नाही. गोदेत पडणारी वर्तुळ पाहण्यात त्या मग्न आहेत. पोरासोरांचं खाणंही संपलंय. त्यांनी कागदाची होडी बनवून गोदेत सोडलीय. ती ही खुश आहे. तिला प्रदुषणाची चिंता नाही हो! तिला तो पोरखेळही वाटत नाही तिला त्यांच्या भावना जपायच्याय अन् ती त्याच्याकडेच लक्ष देतेय. गोदा आता शांत आहे. दुरवरून सूर येताहेत...अरेच्चा हे तर जगजीतचे सूर आहेत. ‘ये दौलत भी ले लो...ये शोहरत भी ले लो’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  मार्केटचे दिवस मार्केटचे ते दिवस छान होते. सायंकाळचे पाच वाजलेले. भाजीने भरलेला टेम्पो घेऊन, त्या घमघमणाऱ्या सुगंधात मधोमध उभा राहून मी मा...