।।श्री स्वामी समर्थ।।
मै गया नहीं, जिंदा हूँ
आज चैत्र शुद्ध द्वितीया. श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन.
हस्तिनापूरातील (दिल्ली) छेली खेडा नावाच्या ग्रामी शके १०७१ (इ.स. ११३९) मध्ये श्री
स्वामी महाराजांची अष्टवर्षीय बालमूर्ती धरणी दुभंगून प्रकट झाली. विजयसिंग नामे भक्त
गोट्या खेळत असताना या लुटूपुटीच्या खेळात समोरच्या भीडूवर म्हणजे तेथे असलेल्या गणेशाच्या
मूर्तीवर डाव आलेला असताना विजयसिंग याने हट्ट धरला की देवा हा डाव तू खेळावा, आणि
त्याच्या बालहट्टाला भुलून एक अष्टवर्षीय मूर्ती तेथे धरणी दुभंगून वर आली. हेच श्री
स्वामी समर्थ महाराज होय. हा काळ प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या आधीचा काळ आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ यांचा काळ १३२०. आंध्रप्रदेशातील सुमती व आपळराजा यांच्या पोटी श्रीपाद
श्रीवल्लभ आले ती कथा सर्वज्ञातच आहे. पितरांच्या श्राद्धाच्या दिवशी भोजन सिद्ध करून
ब्राह्मणांची वाट पाहणाऱ्या सुमतीदेवी यांच्यासमोर येऊन यतीने याचना करताच त्या साध्वीने
त्यांना अन्न दिले. यावर प्रसन्न होऊन यतीराजांनी आपले खरे रूप प्रकट केले, ते म्हणजे
श्री स्वामी समर्थ महाराज. त्यामुळे दत्तात्रेयांचा, १८०० मध्ये झालेला तिसरा अवतार
म्हणजे स्वामी महाराज हा समज थोडाकाळासाठी बाजूला पडतो. तो केवळ प्रकट होण्याचा कालावधी
आहे हे लक्षात घ्यावे. प्रकट होण्याचा म्हणजे जन्म होण्याचा नव्हे तर समाजासमोर येण्याचा
काळ. आसेतू हिमालय भ्रमण करीत असताना देहरूपाने प्रकट होण्याचा काळ जवळ आला आहे असे
जाणून इ.स. १८५६ च्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटास आले. ते मंगळवेढ्याहून
पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात
मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुध्द द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे, रविवार दि.
६ एप्रिल १८५६ हा होता. (येथे एक जाणवते की हस्तिनापूरातील छेले खेडा ग्रामी प्रकट
होण्याची तिथी चैत्र शुद्ध द्वितीया हीच होती.) स्वामी महाराजांनी ज्यांना आपला सूत
मानला, त्या स्वामीसुतांनी (हरिभाऊ दाजिबा तावडे) ही वरील कथा अक्कलकोटात सांगितली
व त्याला स्वामींनी दुजोराही दिला आहे. स्वामीसूतांनी सांगितल्याप्रमाणे अहमदनगरचे
पिंगळा ज्योतिषी नाना रेखींनी स्वामींची कुंडली बनवली. त्याला स्वामी महाराजांनी मान्यता
दिली व ‘नौबत बजाव’ म्हणून आनंदही व्यक्त केला. यावेळी स्वामी अक्कलकोटात शेखनुर दर्ग्यावर
बसलेले होते. तेथील नौबत म्हणजे नगारा नाना रेखींनी जसा जमेल तसा वाजवला, स्वामी खदाखदा
हसून त्यांना प्रसन्न झाले व त्यांच्या हातावर आपला हात जोरात आपटून ‘ये ले आत्मलिंग’
म्हणून त्यांना पहायला लावले तर नाना रेखींच्या उजव्हा हातावर विष्णुपद उमटले होते.
ते शेवटपर्यंत तसेच राहीले. (याबाबतच पुरावे अहमदनगरच्या नाना रेखी यांच्या वाड्यात
जिज्ञासूंना पहायला मिळतील) जन्मकाल बहुधान्य नाम संवत्सरे १०७१ चैत्र शुद्ध द्वितीया,
अश्विनी नक्षत्राचे २ रे चरण. प्रीतीयोग गुरूवार, जन्म दोन घटका दिवसास. आद्य नाडी,
देवगण, यजुर्वेदी, काश्यप गोत्र, टोपणनाव नृसिंहभान, जन्मनाव चैतन्यस्वामी. मेष राशी,
राशीस्वामी मंगळ (संदर्भ : श्री गोपाळबुवा केळकर उर्फ प्रीतीनंद स्वामीकुमार यांनी
लिहिलेली श्री स्वामी समर्थ महाराजांची बखर, संपादन : रा.चिं.ढेरे
एका अर्थाने स्वामींचे प्रकटीकरण दोनवेळा झाले, ते ही चैत्र
शुद्ध द्वितीयेलाच. त्यामुळे आजच्या दिवशी स्वामींचा प्रकटदिन मानला जातो व भक्त मंडळीमध्ये
तो अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. खालील अभंग स्वामीसुतांनी लिहिलेला आहे, यात
स्वामींच्या जन्माची कथा येते. स्वामीसुतांचा जन्मच मुळी श्री स्वामी समर्थांचे प्रकटीकरण
कसे झाले हे सांगण्यासाठी झाला होता.
दत्त माझा अवतरला । दीन भक्तांच्या काजाला ॥०१॥
छेलीखेड्या ग्रामामाजीं । झाला अवतार हा सहजी ॥०२॥
गोटी खेळण्याचा रंग । तेव्हां मनी झालो
दंग ॥०३॥
तेथे होता विजयसिंग । आतां येथे करू
रंग ॥०४॥
गजानन आनंदला । पाहुनियां त्या खेळाला
॥०५॥
नाचताती चहू कोणीं । नुपुरें वाजतीं
चरणीं ॥०६॥
गोटी गोटीचा हा वाद । हरीचा हसण्याचा
छंद ॥०७॥
हंसू लागे वक्रतुण्ड । हलवूनी प्रीती
सोंड ॥०८॥
विष्णु स्तंभी प्रकटलें । दत्त गोटी
फोडूनि आले ॥०९॥
माझ्या स्वामीचीं करणीं । कंप होतसे
धरणीं ॥१०॥
गोटी विजयसिंग मारी । दुसरी गोटी होय
करीं ॥११॥
गोटींचा हो पडला ढिग । चकित झाला विजयसिंग
॥१२॥
गोटी स्वामी माया झाली। स्वामीहस्तीं
ती शोभली ॥१३॥
गोट्या झाल्या रानोमाळ। काय मौजेचा
हा खेळ ॥१४॥
एक प्रहर खेळ केला । समर्थ दाविली ती
लीला ॥१५॥
स्वामीसुत म्हणे झाला । अवतार भक्तांच्या
काजाला ॥१६
(संदर्भ : श्रीदत्तमहाराज डॉट कॉम वेबसाईट)
पुराणांमध्ये काही लोकांचे वर्णन आले
आहे त्यापैकी दत्तलोकातून पृथ्वीवर काही पूर्णावतार सिद्ध आले. तेथीलच एक ठिकाण म्हणजे
कर्दलीवन. कर्दळीवन हे जे आता आपण पहातो, ऐकतो किंवा त्याच्या वाऱ्या करतो त्याच्याशी
स्वामी महाराजांचा दुरान्वयेही संबंध आलेला नाही. कर्दलीवन हा दत्तलोकातील एक भाग,
तेथून श्री स्वामी समर्थ आलेले असा एक संदर्भ आढळतो.
(संदर्भ : श्रीदत्त संप्रदाय या मालिकेतील
चैतन्यप्रेम व रोहन उपळेकर यांच्यातील संवाद)
महाराज प्रारंभी काशीमध्ये राहीले. गंगासंगमी बराच काळ व्यतीत केला.
त्यानंतर कालिमातेच्या दर्शनासाठी ते कलकत्ता गेले. बंगालमध्ये काही काळ राहून त्यांनी
तेथेही असंख्य लिला दाखवल्या. देवलग्राम येथे जाऊन त्यांनी पादुका स्थापन केल्याचाही
उल्लेख आहे. पुढे मोगलाईत जात राजूर येथे मठ स्थापन केला व आठ गावाची जहागिरदारी मिळवून
देत पुढे चालते झाले. येथे महाराजांनी चंचलभारती हे नाम धारण केलेले होते. पुढे रामेश्वर,
उडपी, पंढरपूर व नंतर मंगळवेढे असा हा प्रवास आहे. अक्कलकोटात प्रकटण्याआधी स्वामी
महाराज काही काळ (१२ वर्षे) मंगळवेढ्यास थांबले होते. हा काळ शके १७६० चा होता. तेथे
ते ‘दिगंबरबुवा’ नावाने प्रसिद्ध होते. पंढरपूर, बेगमपूर व मोहोळास आल्यावर एके दिवशी
स्वामी अक्कलकोटात आले. (इ.स.१८५६) स्वामींचे वय बहुत होते, त्यांना ज्यांनी पाहीले
त्यांनी ते खूप जुनाट पुरूष असल्याचे कबूल केले होते. परंतु येथे एक गोष्ट नमूद कराविशी
वाटते की उद्धव नावाच्या लाकुडतोड्याची कुऱ्हाड कर्दळीवनात वारूळावर पडली, रक्त आले,
ती जखम मांडीवर नंतरही होती या वदंता आहेत. स्वामी हे सर्वकाळ होते, त्यांना कोणत्याही
तपश्चर्येची गरज नव्हती. ते स्वत: पूर्णावतार आहेत.
स्वामी मनकवडे होते, अनेकांच्या मनातील विचार ते ओळखत व त्याप्रमाणे
त्याला सांगत. त्यामुळे महाराजांकडे दु:ख सांगायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू
लागली. स्वामी अगदी सामान्य माणसासारखा व्यवहार करत असत त्यामुळे जे मुमुक्षु आहेत
त्यांनाच ते परब्रह्म असल्याचे कळत व त्याप्रमाणे ते त्यांना पूजत असत. अक्कलकोटात
चोळाप्पा महाराज, बाळाप्पा महाराज, ब्रह्मचारीबुवा, आनंदनाथ महाराज हे कार्यरत असताना
तेथे हरिभाऊ तावडे यांच्यासारखा सामान्य माणूस येतो व पहिल्याच भेटीत स्वामी महाराज
त्यांना आपलेसे करतात. यावरून श्री स्वामी महाराजांची पात्रता पाहून स्वीकारण्याची
भूमिका लक्षात येते. स्वामी महाराज, ‘माझी ध्वजा उभार’, ‘माझा किल्ला बांध’, ‘देऊळ
उभे कर’, ‘घरदार लुटव’, ‘संसारावर तुळशीपत्र ठेव’ यासारख्या सूचना हमेशा करत. स्वामींचे
एक वैशिष्ट्य म्हणजे ते खडी हिंदुस्थानी बोली बोलत. त्यांच्या बोलण्यात हिंदी शब्दांचा
उच्चार मोठ्या प्रमाणात होता. महाराजांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत अनाकलनीय होते. त्यांची
भाषा शिवराळ असली तरी ज्यांना उद्देशून ते बोलले त्यांचे कल्याणच झाल्याचे पुढे पाहण्यात
येते.
स्वामींना देहाचे जीर्ण वस्त्रे बदलण्याची वेळ झाली तेव्हा ते बोलले
होते की, ‘ही लोकं उद्या माझा बाजार मांडतील’ आज जेव्हा आजूबाजूला दिसते की भक्तीचा
अक्षरश: बाजार मांडला आहे. स्वामी खूप दयाळू आहेत, केवळ हाक मारल्याने ते येतात असा
अनेकांचा अनुभव आहे. त्यासाठी कोणत्याही रूपया पैशांची गरजच नाही. श्री स्वामी समर्थांचे
शिष्य प.पू. पिठले महाराज नेहमी सांगायचे, ‘सबसे बडा गुरू...गुरूसे बडा गुरू का ध्यास...और
उससे बडे श्री स्वामी समर्थ महाराज.’ महाराजांविषयी आणखी काय बोलावे? ।।श्री स्वामी
समर्थार्पणमस्तू ।।
प्रशांत भरवीरकर
९५०३६७७७४०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा