मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

गोरखधंदा

 गोरखधंदा

१९ ऑगस्ट २०२१. उत्तर भारतातील हरयाणा सरकारने अर्थात मनोहर लाल खट्टर सरकारने ‘गोरखधंदा’ शब्दावर निर्बंध लावल्याची बातमी मध्यंतरी कानावर आली आणि मन गोरखधंदा या शब्दाभोवती रूंजी घालू लागले. गोरखधंदा म्हणजे जटील काम, एखादे गुंतागुंतीचे काम. अकराव्या शतकात गुरू गोरक्षनाथ यांनी ‘धंधारी’ नावाचे एक यंत्र बनवले होते. (नाथपंथीय आताही नेहमी या यंत्रासोबत मंत्रपठण करतात.) एक लाकडाची पट्टी एकमेकांत गुंफून चक्राकार बनवायची व मध्ये छिद्र पाडायचे, त्यातून एक धागा टाकून त्याला पुढे कवडी बांधायची. मंत्र पुटपुटत असताना ही कवडी छिद्रातून व्यवस्थित बाहेर काढायची, नाथपंथीयामध्ये आजही असे मानले जाते की ही कवडी ज्याला व्यवस्थित बाहेर काढता आली तर त्यावर गोरक्षनाथांची कृपा आहे. गोरक्षनाथांनी बनवलेले धंधारी यंत्र आणि कवडी काढायच्या या प्रकाराला म्हटले जायचे गोरखधंदा. परंतु कालांतराने जटील असा अर्थ असलेल्या या शब्दाला काळी किनार आली आणि भ्रष्टाचार, काळे व्यवहार याला पर्यायी म्हणून हा शब्द वापरला जाऊ लागला. वस्तुत: हा शब्द अत्यंत सकारात्मक आहे, गुंतागुंतीची प्रक्रिया इतका साधा सोपा त्याचा अर्थ आहे, तो पुढे लोकांच्या चुकीच्या वापरामुळे बदनाम झाला. गोरखधंदा हा शब्द पूर्णत: नाथसंप्रदायाशी निगडीत असल्याने त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि हरयाणा सरकारने ही गोष्ट ध्यानी घेऊन या शब्दावर निर्बंध घातले.

गोरखधंदा हा शब्द नाथसंप्रदायात वापरला जायचा. रजनीश ओशो यांनी ‘मन मधुकर खेलत वसंत’ या आपल्या पुस्तकात हा शब्द वापरला आहे तसेच जैनेंद्रकुमार यांनीदेखील ‘निबंधो की दुनिया’ या पुस्तकात गोरखधंदा शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मतानुसार गुरू गोरक्षनाथांनी साधनेच्या इतक्या पद्धती शोधल्या होत्या की कोणती पद्धती वापरायची याबाबत साधक भ्रमित होतात व या अवस्थेला गोरखधंदा म्हटले जाते.‘माया का गोरखधंधा, कोई समझ न पाये रे’ असे एक जुने भजनही प्रसिद्ध असून नुसरत फतेह अली खान यांची ‘तुम इक गोरखधंदा हो’ ही कव्वालीदेखील प्रसिद्ध आहे. हे झाले संदर्भ परंतु या शब्दाबरोबर छेडखानी कोणी केली असा प्रश्न विचारला गेला तर इंग्रजांनी असे त्याचे उत्तर आहे. संतांच्या बाबत काही चुकीचे समज पसरून देण्याचा मनसुबा हे इंग्रजांचे सुरूवातीपासूनचे हत्यार होते. त्याचा वापर त्यांनी जेथे करायचा तेथे बरोबर केला. गोरखधंदा शब्दही त्यातून वाचू शकला नाही. धंधारी पासून आले ते धंदा व गोरक्षनाथांपासून आला तो गोरख परंतु येथे धंदा म्हणजे व्यापार या अर्थाने तो घेतला गेला आणि धोका, कपट अशा अर्थाने हा शब्द वापरण्यास सुरूवात झाली. गोरक्षनाथांनी आविष्कृत केलेल्या या शब्दाची आजही यथायोग्य वाट लावली जात आहे.   

 

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

कृष्ण

 कृष्ण

आज कृष्ण जयंती, नाही परंपरेनुसार आज श्रीकृष्ण जयंती पण श्रीकृष्णांपेक्षा कृष्ण जवळचा वाटतो, श्री जोडला की मग ते मोठे होतात व अनायासेच आपल्यातून, माणसातून जाऊन देवत्त्वाकडे झुकतात. झुकतात कसले देवच होतात. कृष्ण म्हटले म्हणजे कसे सखा वाटतो. ही आणखी एक अडचण आहे बरे का. कृष्ण म्हटले की त्याला ललितकडे ओढण्याचा आपल्याकडील लेखकरावांचा प्रयत्न असतो. त्यात राधा येते, मग रासक्रीडा येते, प्रेम येते, आठवणी येतात, भावना येतात आणि त्याला ललितमध्ये कैद करून त्याची मजाच घालवली जाते. मला वाटते मला मांडायचाय तो वेगळा कृष्ण आहे.

कृष्ण हे भगवान विष्णुंच्या नामांपैकी एक नाम. त्याला भगवान विष्णुंचा आठवा अवतारही मानतात. कृष्णाचा ‘देवकीपुत्र कृष्ण’ असा उल्लेख छांदोग्य उपनिषदात (३.७.६) आला आहे. कृष्ण हे नाव ‘विष्णू सहस्रनामात’ ५७ व्या तर ‘केशव’नामात २४ व्या क्रमांकावर येते. कृष्ण हा द्वापारयुगाच्या अखेरीस म्हणजे द्वापारयुग आणि कलियुग यांच्या संधिकालात इ.स.पू. तीन हजार वर्षांच्या आसपासचा. कृष्ण हे ऋग्वेदाच्या आठव्या मंडलातील ७४ व्या सुक्ताचा कर्ता असलेल्या एका ऋषींचे नावही होते. त्यानुसार इतिहासकाळात अनेक कृष्ण झाले असावेत असा कयास आहे. कृष्णाची मातामातामह मारिषा व सावत्र आई रोहिणी या नागकुळातील होत्या. यादवकुळात वसुदेव-देवकी यांच्या पोटी जन्मलेल्या कृष्णाचे गुरू उज्जैनचे सांदीपनी ऋषी होते. शंखासूराच्या मृत्युनंतर त्याच्या शवाजवळील शंख कृष्णाने सांदीपनींना दिला, त्यांनी त्याचे नाव ‘पांचजन्य’ ठेवून तो कृष्णाला परत केला. तसेच सोबत ‘अतितंजय’ नावाचे धनुष्य दिले. त्याच्या खडगाचे नाव नंदक व गदेचे नाव कौमौदकी होते. याशिवाय कृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र भगवान विष्णुंनी उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. तेच पुढे कृष्णावतारात धारण केले व वापरले. कृष्णाकडे मुरलीही होती. पहिली मुरली पालकपिता नंद यांनी (राधेने नव्हे) दिली होती. कृष्णाची ‘नारायणी’ सेना ही अतिविध्वंसक व कलारिपट्टू युद्धात निपुण होती म्हणूनच दुर्योधनाने कृष्णाची निवड न करता नारायणी सेनेची निवड केली होती. कलारिपट्टू पुढे बोधिधर्मन व कालांतराने मार्शल आर्ट म्हणून प्रगत झाली असल्याचे दाखले मिळतात.   

कृष्णाला पारिजातकाचे फूल, राधेने दिलेली वैजयंतीमाला (तुळशीची माळ) अत्यंत आवडीची. कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी त्यांची नावे ठेवण्यात आली होती. कृष्णाला उत्तम सारथ्यकला अवगत होती. त्याच्या रथाचे नाव ‘जैत्र’ व सारथ्याचे नाव ‘दारूक’ होते. पुढे महाभारत युद्धात कृष्ण अर्जुनाचा सारथी बनला. कृष्ण अत्यंत कुशल धनुर्धर होता याचे उत्तम उदाहरण म्हणजे मद्र देशाची राजकुमारी लक्ष्मणा (कृष्णाचा मुलगा सांब याच्या पत्नीचे नाव देखील लक्ष्मणाच होते, ती दुर्योधन व भानुमती यांची कन्या होती. येथे गल्लत होऊ शकते म्हणून संदर्भ दिला.) हिला वरण्यासाठी अर्जुन, कर्ण व कृष्ण हे तिघे स्वयंवरात होते परंतु माशाचा वेध एकट्या कृष्णालाच घेता आला. कृष्णाच्या त्वचेचा रंग मेघश्यामल होता आणि त्याच्या अंगप्रत्यंगातून एक विशिष्ट सुगंध नेहमी दरवळत असे, त्याची कोमल त्वचा युद्धात अत्यंत वज्रमय होत असे हिच बाब कर्ण व द्रौपदीच्या बाबतीतही होती. आसाममध्ये बाणासूरासोबत झालेल्या युद्धात भगवान शिव कृष्णाच्या विरोधात उभे ठाकले असता त्यांनी महेश्वर ज्वर अस्त्राचा प्रयोग केला तेव्हा त्याविरोधात वैष्णव ज्वर अस्त्र योजून कृष्णाने जगातले पहिले जिवाणू युद्ध केले असल्याचे उल्लेख शास्त्रात सापडतात.

‘महाभारत’, ‘विष्णुपुराण’, ‘भागवतपुराण’ किंवा ‘हरिवंशपुराण’ यामध्ये राधेचा साधा उल्लेखही नाही. ‘ब्रह्मवैवर्तपुराण’ या ग्रंथात राधा ही कृष्णाची परमप्रिया असल्याचा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. ‘राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे', असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती. राधेचे कृष्णावर मनापासून प्रेम होते. ब्रह्मवैवर्तपुराण आणि गर्ग संहितेमध्ये, कृष्णाने वृंदावनाजवळील भांडीरवन जंगलात भगवान ब्रह्माच्या उपस्थितीत गुप्तपणे राधाशी लग्न केले होते, असा उल्लेखही आला आहे.

कृष्णचरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेआठ वर्षे होते. महाभारतात कृष्णाच्या मृत्यूचे वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णाचा मृत्यू इ.स.पू. ५५२५ या वर्षी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. महाभारत काळात जो कृष्ण यादवांचा नेता आणि पांडवांचा हितकर्ता अशा मानवी रूपगुणांत दिसला, तोच पुढे मानवांचा उपास्यदेव बनला. कृष्ण हा यादवांच्या सात्वत कुळात जन्मला होता, त्यांनीच त्याला उपास्य दैवत मानले.

कृष्णाच्या मृत्युची कथा दारूण आहे. जाम्बुवती व कृष्णाचा मुलगा सांब अत्यंत रूपवान परंतु अपरिपक्व. त्याने वसिष्ठ, विश्वामित्रादी ऋषी व नारदमुनी द्वारकेला आले असताना त्याने स्त्रीवेश धारण करून ‘आपण गर्भवती आहोत, काय होईल’ असे विचारले असता हे थोतांड सर्व ऋषींच्या लक्षात आले त्यांनी ‘तुला मुसळ होईल व ते समस्त यदूवंशाचा नाश करील’ असे सांगितले. अर्थात सांबाच्या पोटातून मुसळ वगैरे येणे ही फॅण्टसी होऊ शकेल परंतु मूळ असे आहे की सांबाने एका अतिविशाल अशा मुसळाची निर्मिती केली. ते राजा उग्रसेनाला कळताच त्याने या लोखंडी मुसळाचे चूर्ण बनवून प्रभास नदीच्या तिरावर फेकून दिले. (यादव कुळातील तरूणांच्या भोगी व विलासी वृत्तीला कंटाळून कृष्णाने त्यांना प्रभास नदीच्या काठावर तीर्थयात्रा करण्याचे सुचवले होते परंतु तेथे मद्यधुंद होऊन त्यांनी एकमेकांमध्ये युद्ध केले. तेच यादवी युद्ध, त्यात सर्वजण मृत्यु पावले.) यातील लोखंडाचा काही भाग माशाने गिळला व पुढे हा मासा एका व्याधाच्या हाती लागला. त्याने त्या लोखंडाच्या तुकड्यापासून बाण बनवला व तोच पुढे कृष्णाच्या अंगठ्याला मृगाचे मुख समजून मारला त्यात कृष्णाचा अंत झाला, अशी कथा ऐकवण्यात येते. कृष्ण मानव होता, असेलही तो अतिमानव परंतु तो माणसासारखे जगला व त्याच्यासारखाचा मृत्यु पावला. कृष्णार्पणमस्तू.  

-प्रशांत भरवीरकर




गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

नागांचा आदिमबंध


 नागांचा आदिमबंध

श्री एम यांच्या ‘हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन’ या आत्मचरित्रात एक प्रसंग आहे. सत्य हे बऱ्याच वेळा कल्पनेपेक्षा अदभूत असू शकते याची ती प्रचिती. श्री एम यांचे गुरू महेश्वरनाथ बसलेल्या गुहेत आकाशातून एक अग्नीलोळ येतो व त्यातून एक सर्प प्रकट होऊन बाबाजींशी संभाषण करून पुन्हा त्याच मार्गाने निघून जातो. त्यावर महेश्वरनाथ नागलोकाविषयी अनेक गोष्टी सांगतात. आकाशगंगेमध्ये सात ग्रह व अठरा चंद्र असलेली एक सौरमाला असून त्यापैकी एका ग्रहाला सर्पलोक म्हटले जाते. त्या ग्रहावर अत्यंत प्रगत अशी फणा असलेली सर्प जमात वास्तव्य करते. त्या लोकांना नागदेवता असे म्हटले जाते. अनेक पुरातन संस्कृतीमध्ये नागपुजेला जे स्थान दिले आहे ती पूजा म्हणजे प्रगत अशा नागसंस्कृतीला दिलेली एक मानवंदनाच ठरते.
सर्पकुळात अधिष्ठाता। वासुकी गा मी कुंतीसुता। नागांमाजी समस्ता। अनंतु तो मी।।
                                     -ज्ञानेश्वरी अध्याय १० वा  
श्रीकृष्ण भगवदगीतेत सांगतात, सर्पांचा राजा वासुकी मी तर नागांचा राजा अनंत मी यावरून या कुळाचे श्रेष्ठत्व लक्षात येते. अरूण ताह्मणकरांचे ‘सर्पंगंध’ नावाचे एक पुस्तक वाचण्यात आले होते. त्यात नागांचे अतिशय सुरस वर्णन केलेले होते. त्यांनी नागांचा व कुंडलिनी शक्तीचा संबंध जोडलेला होता.
नागाचें पिलें, कुंकुमे नाहलें। वळण घेऊनि आलें, सेजे जैसें।। २२२
तैशी ते कुंडलिनी, मोटकी औट वळणी अधोमुख सर्पिणी, निजैली असे।। २२३
                        -ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा
श्री ज्ञानेश्वर जेव्हा कुंडलिनीचे वर्णन करतात तेव्हा ते नागाचा व सर्पांचा आधार घेतात. यावरूनही त्यांचे महात्म्य आपल्या लक्षात यावे. सर्पकूळ किती आदिम तर रामचरितमानसमध्ये विनता व कद्रुची एक कथा आली आहे, महाभारताच्या आदिपर्वामध्येही ती येते. दक्ष प्र्रजापतीच्या दोन कन्या, विनता व कद्रु यांनी कश्यप ऋषींसोबत विवाह केला. एकदा प्रसन्न होऊन कश्यप ऋषींनी त्यांना वरदान मागायला सांगितले तेव्हा कद्रुने एक हजार पराक्रमी पुत्रांची आई होण्याचे व विनताने दोनच परंतु कद्रुच्या पुत्रांपेक्षा अधिक पराक्रमी ते असावेत असा वर मागितला. त्याप्रमाणे कद्रुला एक हजार पुत्र झाले. तेच सर्प असे मानले जाते. विनताचे मुलगे अरूण(हा सुर्याचा सारथी) व दुसरा गरूड. तर असे हे महापराक्रमी सर्प. गरूडाने अमृतकुंभ आणून ज्या चऱ्यांवर ठेवला तेथे अमृतकण सांडले असतील म्हणून सर्पांनी ते चरे जिभेने चाटण्याचा प्रयत्न केल्याने त्यांची जीभ मधोमध कापली गेली व त्या दोन झाल्या असाही एक संदर्भ महाभारतात आहे तर सर्पांचा उल्लेख महादेवपुराणातदेखील आढळतो. मंदराचल पर्वताची रवी करून वासुकी सर्पाची दोरी करून समुद्र्रमंथन केले तेव्हा त्यातून हलाहल बाहेर आले, ते सृष्टीला जाळत असताना महादेवाने ते प्र्राशन केले हे त्यात आलेच आहे परंतु समुद्रात जे विष पसरले होते ते पिण्याचे काम या सर्पांनीच केले आणि मानवजगताला अभय प्रदान केले. नागांचा संदर्भ असा आदिम आहे. आपण पुराणकाळापासून देवघरात ज्या नाग-नरसोबाची पूजा करतो तो म्हणजे नागांप्रती कृतज्ञता भावच आहे. नरसोबा म्हणजे नृसिंह महाराज. प्रल्हाद व हिरण्यकश्यपूची ती कथा. दुसरी कथा कालियामर्दनाची, तिसरी कथा जिवत्यांची तर चौथी बुध-बृहस्पतीच्या युद्धाची. या कथा आपल्याला काय सांगतात? केवळ कृष्णाने कालियामर्दन केले, अथवा जिवत्यांनी बाळांना मांडीवर घेऊन जोजावले इतकेच का? नाही नाग-नरसोबाच्या पुजनातून आपण हा बोध घेतला पाहीजे की आपली संस्कृती ही आदिम आहे. तिचा आपण अभिमान बाळगला पाहीजे. एका स्त्रीच्या पोटी सर्प कसे आले, तिने एक हजार अंडे कसे दिले, त्यातून सर्पच कसे बाहेर आले, त्यांनी उच्चैश्रवा घोड्याच्या शेपटीला स्वत:ला बांधून घेऊन आई, कद्रुला विजय कसा मिळवून दिला, विनता कशी तिची दासी झाली, सर्पांच्या दोन जिव्हा कशा झाल्या, त्यांनी विष कसे पचवले यातील चमत्कारांचा भाग आपण सोडून देऊ थोडावेळ परंतु पुराणकाळापासून नागजमात ही मानवाची मदत करत आली आहे, ती अगदी शेतातील उंदीर नष्ट करण्याच्या रूपाने असो किंवा आजच्या मॉडर्न सायन्समधील अनेक औषधे हे सर्पांच्या लाळेपासून अथवा विषापासून बनवण्यात आले आहेत येथपर्यंत असो. या आदिम जमातीने मानवासाठी मैत्रीचा हात नेहमी पुढे केला आहे. मुळात महाभारतात तर त्यांना मानवाचाच नव्हे त्यांच्यापेक्षा प्रगत असल्याचा दर्जा दिला आहे. काही शास्त्रांमध्ये असेही येते की जेव्हा गुंतागुंतीच्या प्रश्नांनी आपल्यासमोरचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा आपले पितर नागाच्या माध्यमातून येऊन ते प्रश्न सोडवतात. यातीलही अतिशयोक्ती किंवा फॅण्टसीचा भाग आपण सोडून देऊ, त्यांचे दर्शन म्हणजे मानवजातीसाठी एक आश्वासकता घेऊन येते एवढे जरी यातून आपण घेतले तरी सार्थक.
©️प्रशांत भरवीरकर

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

गोदाघाट : प्रवास शंभर पावलांचानाशिकमध्ये येणारा...




गोदाघाट : प्रवास शंभर पावलांचा
नाशिकमध्ये येणारा...
: गोदाघाट : प्रवास शंभर पावलांचा नाशिकमध्ये येणारा प्रत्येकजण गोदेचा आशीर्वाद घेऊन रविवार कारंजावर प्रवेश करतो...नाशिकमध्ये येतो...खूप...

एनर्जी 


 एनर्जी 
मानवी देहामध्ये शक्तीचे सातपुंजके असतात, क...: एनर्जी  मानवी देहामध्ये शक्तीचे सात पुंजके असतात, कुणी त्याला कुंडलिनी म्हणते, कुणी आणखी काही. या शक्तीपुंजक्याला सकारात्मक ऊर्जा देणारी ...

कृष्णपिसे गहिरे...!



कृष्णपिसे गहिरे...!संदीपची नायिका कधी वादळ कधीशां...
: कृष्णपिसे गहिरे...! संदीपची नायिका कधी वादळ कधी शांत वारा. पावलांच्या ठशाठशामध्ये तिने कितीतरी मनोरम्य आठवणी साचवून ठेवलेल्या असतील. आत...

सोमवार, १८ मार्च, २०१९

उत्सवांची सरमिसळ झाल्याने...!


उत्सवांची सरमिसळ झाल्याने...!

महाराष्ट्र हा उत्सवप्रिय लोकांचा देश आहे. सण कोणताही असो त्याचे उत्सवी स्वरूप येथील कलारसिक माणसांना आनंद देते. होळी, धुळवड आणि रंगपंचमी हे तीन उत्सव यापैकीच. उन्हाळ्याच्या सुरूवातीला येणारे हे तीन उत्सव गेल्या काही वर्षांपासून मात्र गोंधळाच्या वातावरणातच पार पडताना दिसत आहेत. असे असले तरीही नाशिककर मात्र अद्यापही परंपरा राखून आहेत. हे तीनही उत्सव त्या त्या पध्दतीने साजरे करण्यातच त्यांना आनंद वाटतो. होळीला गोवऱ्या, लाकडांची रास रचत अमंगलाच्या नष्टतेचा आनंद साजरा केला जातो. धुळवडीला राख फासत पारंपरिकतेला सलाम केला जातो तसेच रंगपंचमीला रहाडींमधून रंग खेळला जातो.
_________
समभाव ही भावना एकमेकांच्या उत्कर्षासाठी असते परंतु त्यामुळे काही बाबींचा ऱ्हासही होतो. एखाद्या भागात अनेक ठिकाणांहून आलेले लोक रहात असतील तर त्यांचे उत्सव एकमेकांवर अतिक्रमण करतात. याचे जिवंत उदाहरण म्हणजे होळी. नामसाधर्म्यामुळे होळी सणाला आता बऱ्याच अंशी ‘होली’चे स्वरूप येत चालले आहे किंबहुना होळी ही पुरती ‘होली’ बनून गेली आहे. सध्या तरी आजुबाजूला तसेच चित्र पहावयास मिळते. नाशिक मात्र उत्सवांच्या बाबतीत अद्यापही सहीसलामत आहे. येथील रहाडी, दाजिबा वीर, वीरांची मिरवणूक, होळीचा माहोल याला एक वेगळीच चमक आहे.
पारंपरिक उत्सवांनी एकमेकांवर अतिक्रमण केल्याने पूर्वापार चालत आलेल्या अनेक रूढी परंपरांशी उत्सवांची फारकत होऊ लागली आहे. तसे पाहता होळी, धुळवड (धुलीवंदन) व रंगपंचमी हे तीन वेगवेगळे उत्सव आहेत. होळी म्हणजे अमंगलाचा नाश, धुळवड म्हणजे तीव्र उन सहन करण्याची शक्ती देणारा दिवस आणि रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव. परंतु दरम्यानच्या काळात झाले काय की अनेक संस्कृतीचे लोक एकत्र येऊन राहू लागले व त्यांचे सण समारंभ त्यांच्या पध्दतीने साजरे करू लागले. उत्तरभागातून आलेले अनेक लोक त्यांच्या ‘होली’ची तुलना आपल्या होळीशी करू लागले व होळीच्या दिवशीच होली म्हणजे त्यांची रंगपंचमी साजरी करू लागले. याला आधार मिळाला तो होळीच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या आपल्या धुळवडीमुळे. आदल्या दिवशी पेटवलेल्या होळीची राख धुळवडीच्या दिवशी अंगाला फासण्याची आपली पूर्वापार परंपरा आहे. राख फासल्याने कमीपणा येतो म्हणून आणि उत्तरेकडील लोक यादिवशी त्यांची ‘होली’ खेळत असल्याकारणाने धुळवडीला रंग खेळण्याची परंपरा जोर धरू लागली. आजही अनेक भागात धुळवडीच्याच दिवशी ‘होली है’ म्हणत मराठी बांधव रंग खेळू लागले. म्हणजेच नामसाधर्म्यामुळे होळीच्या दिवशीच होली (रंगपंचमी) साजरी करण्याचा प्रघात पडला. याचा प्रतिकूल परिणाम असा झाला की येथील लोक होळी खेळली का? होळी है, अशा ललकाऱ्या देऊ लागले. होळी व ‘होली’चा काला होऊन रंगपंचमीपर्यंत चार-पाच दिवस रंगांचा हा उत्सव खेळला जाऊ लागला.
मूळात होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. लाकडांची रास करून ती जाळतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा, चांगल्याचा, उदात्ततेचा स्विकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे. या उत्सवाला ‘होलिकादहन’ किंवा ‘होळी’, ‘शिमगा’, ‘हुताशनी महोत्सव’, ‘दोलायात्रा’, ‘कामदहन’ अशी वेगवेगळी नावे आहेत. त्यामागे काही धार्मिक कथाही आहेत. भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन जाळात उडी मारणारी होलिका ईश्वराच्या सामर्थ्यामुळे जळून खाक झाली ही ती कथा व त्या होलिका शब्दाचा झालेला अपभ्रंश म्हणा किंवा उच्चारामुळे झालेला बदल म्हणा ‘होळी’ असा शब्द निर्माण झाला असावा असा तर्क बांधण्यात येतो. खरं म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी त्या शांत झालेल्या होळीची राख अंगाला का लावायची तर पुढे सुरू होणारा कडक उन्हाळा आपण सहन करू शकू यासाठी. त्याला आपल्याकडे धुळवड संबोधण्यात येते. हा चांगला विचार अंगाला चिखल लावायचा, घाण पाणी, एकमेकांच्या अंगावर टाकायचं या आणि अशा ओंगळ कृतीमुळे मागे पडला. मग या दिवशी रंगच का खेळू नये या वृत्तीतून रंगांच्या उत्सवावर अतिक्रमण झाले. धुळवडीलाही रंग खेळण्याची परंपरा सुरू झाली. रंगपंचमी हा तर रंगांचाच उत्सव तो होळीनंतर लगेचच दोन-चार दिवसांनी येतो.  त्यादिवशी एकमेकांच्या अंगाला रंग लावून खेळाचा आनंद घेतला जातो. अंगाला रंग लावण्यामागे अशी भावना आहे की जितका जास्त रंग खेळाल तितके ऊन कमी लागते. त्यातूनच मग पाण्याचा कमी वापर करावा, इको फ्रेण्डली रंगपंचमी साजरी करावी, नैसर्गिक रंगांनाच प्राधान्य द्यावे वगैरे बाबी प्रामुख्याने आल्या. परंतु सर्वात जास्त गोंधळ झाला तो होळी, धुळवड आणि रंगपंचमी या तिघा उत्सवांची सरमिसळ झाल्याने. गेल्या काही वर्षांपासून बेमालूमपणे हे झाल्याने उत्सवांच्या या अतिक्रमणांचे वाटावे तेवढे वाईट हे थोडेच आहे.
‘होळी’ या एका शब्दापाशी हे उत्सव येऊन खिळले आहेत का याचा विचार करण्याची आता गरज निर्माण झाली आहे. होळी शब्दाशी जवळीक साधणारा ‘होली’ हा शब्द असल्याने असे झालेय का हे ही तपासून पाहताना मूळ होळी संकल्पनेपासून आपण दूर तर जात नाही ना याकडे गांभीर्याने पाहण्याचीही वेळ आलेली आहे.



  मार्केटचे दिवस मार्केटचे ते दिवस छान होते. सायंकाळचे पाच वाजलेले. भाजीने भरलेला टेम्पो घेऊन, त्या घमघमणाऱ्या सुगंधात मधोमध उभा राहून मी मा...