शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

नाथपंथ

 

नाथपंथ

‘आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा’ हे वचन प्रसिद्ध आहे. आदिनाथ म्हणजे महादेव, शिवशंकर भगवान. या सृष्टीमध्ये जे काही आहे ते शिव आहे. शिवतत्त्व हे सृष्टीला जन्म देणारे, पालन करणारे व संहार करणारे अशा व्यापक स्वरूपात आहे. या पृथ्वीवर जे सिद्ध झालेत, जे आहेत व यापुढेही सामान्य जीवांना मार्गदर्शन करीत राहणार आहेत त्या सर्व सिद्धांचे गुरू म्हणजे आदिनाथ. आणि ते सिद्ध म्हणजे नाथ, नाथपंथीय सर्व. नाथपंथीयामध्येही प्रामुख्याने नवनाथ. त्यातही केंद्रभागी मच्छिंद्रनाथ (कुणी मत्स्येंद्रनाथही म्हणते) व गोरक्षनाथ. आपण कधीपासून नवनाथांना ओळखतो तर धुंडिसूत मालुकवींनी नवनाथ भक्तीसार ग्रंथ लिहिला, श्रावणात आपण त्याची पारायणे केली तेव्हापासून. अध्याय संपतो तेव्हा ‘संमत गोरक्षकाव्य किमयागार’ अशी मुद्रा तेथे आहे. ‘किमयागार’ नावाचा ग्रंथ गोरक्षनाथांनी सिद्ध केला त्यातून ही कथा घेण्यात आल्याचे मालुकवींनी म्हटलेय (यात अनेक वाद आहेत, गोरक्षनाथांनी किमयागार ग्रंथ लुप्त केला होता तर यांना कसा मिळाला वगैरे) तर आपली व नवनाथांची ओळख भक्तीसार ग्रंथापासून झाली, नाथ प्राचीन आहेत. आठव्या शतकात हा संप्रदाय उदयास आला, नवव्या शतकात मत्स्येंद्रनाथ व गोरक्षनाथ आले. अशी मान्यता आहे की, मत्स्येंद्रनाथ मासळीच्या पोटातून तर गोरक्षनाथ गोवरीच्या राखेतून जन्माला आले. त्यानंतरच्या अनेक कथा, आख्यायिका प्रसिद्ध आहेत. गोरक्षनाथांबरोबरच अत्यंत महत्त्वाचे म्हणून जालंदरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, भर्तृहरीनाथ, रेवणनाथ, अडभंगनाथ, वटसिद्ध नागनाथ, चौरंगीनाथ यांचा उल्लेख होतो. शिवशक्ती व भगवान दत्तात्रेय ही नाथपंथाची आराध्य. यापैकी अनेक नाथांना दत्तप्रभूंनीच अनुग्रह दिल्याचे उल्लेख भक्तीसारमध्ये येतात. दत्तप्रभू व गोरक्षनाथांच्या भेटीचे उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये आहे. रैवतक पर्वत (आताचा गिरनार) येथे गोरक्षनाथांचे स्थान व दत्तात्रेयांचे स्थान आहे, यावरून त्यांच्या भेटीची पुष्टी मिळते. गुरू गोरक्षनाथांना भगवान शंकराचा अवतार मानले जाते म्हणून त्यांना शिवगोरक्ष असेही म्हटले जाते. नवव्या शतकातील गोरक्षनाथ परमयोगी असल्याने चिरंजीव आहेत. त्यांचा संचार सर्वत्र असतो. त्याचे प्रमाण म्हणजे उज्जैनचा राजा विक्रमादित्य याने बनवलेले पंचाग. विक्रम संवत या पंचागांची सुरूवात अकराव्या शतकातील आहे. या विक्रमादित्याचा लहान भाऊ राजा भर्तृहरीला गोरक्षनाथ भेटल्याचे उल्लेखही आढळतात. गोरक्षनाथ संत कबीर व गुरूनानक देव यांना भेटल्याचेही उल्लेख आहेत. मत्स्येंद्रनाथ यांचा काळ नवव्या शतकातील आहे याच्या पुष्टीकरीता त्यांनी लिहिलेल्या ‘कौल ज्ञान निर्णय’ ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. (या ग्रंथातील लिपी अकराव्या शतकाआधीची आहे हे डॉ. प्रबोधचंद्र वागची यांनी १९३४ मध्ये लिहिलेल्या कलकत्ता संस्कृत सिरिज मध्ये म्हटले आहे.) ९७५-१०२५ हा ज्यांचा कालावधी मानला गेला आहे, त्या अभिनवगुप्त यांनी ‘तंत्रलोक’ ग्रंथाच्या सुरूवातीला मत्स्येंद्रनाथ यांना प्रणाम केला आहे, यावरून त्यांचा कालावधी निश्चित करण्यास मदत होते. मत्स्येंद्रनाथ स्त्री राज्यात अडकले तेव्हा गोरक्षनाथांनी गीतगायन करून त्यांची सुटका केल्याचेही भक्तीसारमध्ये आले आहे. (वात्सायनच्या म्हणण्यानुसार सध्याचे दक्षिण गुजरात, बारबोसाच्या म्हणण्यानुसार सकोतरा बेटावर (सकोतरा बेट हे येमेनच्या दक्षिणपूर्व बाजूस आहे. तसेच एका चिनी पर्यटकाच्या म्हणण्यानुसार हिंदी महासागराच्या पूर्व भागातील एका भूभागात स्त्री राज्य होते.) मुळात स्त्री राज्यात पुरूषांना मोहिनी घालून ठेवले जायचे, तेव्हा वशीकरणाचे प्राबल्य होते. मत्स्येंद्रनाथांवर वशीकरण झाले तेव्हा गाण्याच्या स्वरातून गोरक्षनाथांनी ते निष्प्रभ केल्याचे उल्लेख सापडतात. घोड्याच्या लिदीमध्ये बारा वर्षे राहिलेले जालंदरनाथ असोत की वाताकर्षण अस्त्राच्या साहाय्याने लवंग वनातील विविध मधुर फळे आकाशमार्गाने आणणारे कानिफनाथ असोत नाथसंप्रदाय हा सामान्य माणसासाठी नेहमीच आकर्षण राहीला आहे. तो आकर्षण का राहिला त्यालाही कारण आहे, अतिमानवीय जे काही आहे त्याचे नेहमीच सामान्य माणसाला आकर्षण असते. वायुगमन अस्त्र, वाताकर्षण अस्त्र, संजीवनी विद्या याचा नाथांनी केलेला चपखल वापर आणि त्यांचे देवादिकांना हरवून अँग्री यंग मॅन असल्याचे कोठेतरी माणसाच्या मनावर ठसते. एक कुसुम झोकुनि वरती। चला म्हणावे मम कार्याप्रती। नवनाथ वंदुनि उक्ती। नमस्कार करावा।। हे उगाचच म्हटले गेलेले नाही. त्यांच्या केवळ स्मरणाने आज माणसाला संरक्षित झाल्यासारखे वाटते. श्रावण महिन्यात ज्ञानेश्वरी, गुरूचरित्र, हरिविजय, देवीविजय, भागवत यांची जितकी पारायणे होतात, तितकीच किंबहुना त्याहून अधिक पारायणे नवनाथ भक्तीसार ग्रंथाची होतात. जनमानसात नाथांनी अद्याप गारूड केलेले आहे ते उगाच नाही.   

---

संदर्भ :

नवनाथ भक्तीसार : धुंडिसुत मालूकवी

अमोघ : चंद्रहास शेट्ये : कोमल प्रकाशन  

गोरखदर्शन : गोरखनाथ मंदिर, गोरखपूर 

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

गोरखधंदा

 गोरखधंदा

१९ ऑगस्ट २०२१. उत्तर भारतातील हरयाणा सरकारने अर्थात मनोहर लाल खट्टर सरकारने ‘गोरखधंदा’ शब्दावर निर्बंध लावल्याची बातमी मध्यंतरी कानावर आली आणि मन गोरखधंदा या शब्दाभोवती रूंजी घालू लागले. गोरखधंदा म्हणजे जटील काम, एखादे गुंतागुंतीचे काम. अकराव्या शतकात गुरू गोरक्षनाथ यांनी ‘धंधारी’ नावाचे एक यंत्र बनवले होते. (नाथपंथीय आताही नेहमी या यंत्रासोबत मंत्रपठण करतात.) एक लाकडाची पट्टी एकमेकांत गुंफून चक्राकार बनवायची व मध्ये छिद्र पाडायचे, त्यातून एक धागा टाकून त्याला पुढे कवडी बांधायची. मंत्र पुटपुटत असताना ही कवडी छिद्रातून व्यवस्थित बाहेर काढायची, नाथपंथीयामध्ये आजही असे मानले जाते की ही कवडी ज्याला व्यवस्थित बाहेर काढता आली तर त्यावर गोरक्षनाथांची कृपा आहे. गोरक्षनाथांनी बनवलेले धंधारी यंत्र आणि कवडी काढायच्या या प्रकाराला म्हटले जायचे गोरखधंदा. परंतु कालांतराने जटील असा अर्थ असलेल्या या शब्दाला काळी किनार आली आणि भ्रष्टाचार, काळे व्यवहार याला पर्यायी म्हणून हा शब्द वापरला जाऊ लागला. वस्तुत: हा शब्द अत्यंत सकारात्मक आहे, गुंतागुंतीची प्रक्रिया इतका साधा सोपा त्याचा अर्थ आहे, तो पुढे लोकांच्या चुकीच्या वापरामुळे बदनाम झाला. गोरखधंदा हा शब्द पूर्णत: नाथसंप्रदायाशी निगडीत असल्याने त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि हरयाणा सरकारने ही गोष्ट ध्यानी घेऊन या शब्दावर निर्बंध घातले.

गोरखधंदा हा शब्द नाथसंप्रदायात वापरला जायचा. रजनीश ओशो यांनी ‘मन मधुकर खेलत वसंत’ या आपल्या पुस्तकात हा शब्द वापरला आहे तसेच जैनेंद्रकुमार यांनीदेखील ‘निबंधो की दुनिया’ या पुस्तकात गोरखधंदा शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मतानुसार गुरू गोरक्षनाथांनी साधनेच्या इतक्या पद्धती शोधल्या होत्या की कोणती पद्धती वापरायची याबाबत साधक भ्रमित होतात व या अवस्थेला गोरखधंदा म्हटले जाते.‘माया का गोरखधंधा, कोई समझ न पाये रे’ असे एक जुने भजनही प्रसिद्ध असून नुसरत फतेह अली खान यांची ‘तुम इक गोरखधंदा हो’ ही कव्वालीदेखील प्रसिद्ध आहे. हे झाले संदर्भ परंतु या शब्दाबरोबर छेडखानी कोणी केली असा प्रश्न विचारला गेला तर इंग्रजांनी असे त्याचे उत्तर आहे. संतांच्या बाबत काही चुकीचे समज पसरून देण्याचा मनसुबा हे इंग्रजांचे सुरूवातीपासूनचे हत्यार होते. त्याचा वापर त्यांनी जेथे करायचा तेथे बरोबर केला. गोरखधंदा शब्दही त्यातून वाचू शकला नाही. धंधारी पासून आले ते धंदा व गोरक्षनाथांपासून आला तो गोरख परंतु येथे धंदा म्हणजे व्यापार या अर्थाने तो घेतला गेला आणि धोका, कपट अशा अर्थाने हा शब्द वापरण्यास सुरूवात झाली. गोरक्षनाथांनी आविष्कृत केलेल्या या शब्दाची आजही यथायोग्य वाट लावली जात आहे.   

 

  मार्केटचे दिवस मार्केटचे ते दिवस छान होते. सायंकाळचे पाच वाजलेले. भाजीने भरलेला टेम्पो घेऊन, त्या घमघमणाऱ्या सुगंधात मधोमध उभा राहून मी मा...