बुधवार, १६ मार्च, २०२२

अर्धे नव्हे पूर्ण...!

 

अर्धे नव्हे पूर्ण...!

महाराष्ट्रात पूर्वापार साडे तीन शक्तीपीठ म्हणून जे पूजले जातात त्यापैकी अर्धे पीठ मानण्यात आलेले (कोणताही शास्त्राधार नाही) वणीच्या सप्तश्रुंगी देवीचे ठिकाण हे खरे तर महाराष्ट्रातील एकमेव पूर्णपीठ आहे. आश्चर्य वाटले ना? परंतु सत्यं वदं, हेच खरे आहे. भागवत पुराणात मात्र एकशेआठ शक्तीपीठांचा उल्लेख असून त्यापैकी तीन महाराष्ट्रात असल्याचे सांगण्यात आले आहे. सती मातेची हनुवटी वणी गडावर पडल्याने तेथे हे शक्तीपीठ निर्माण झाले, ते स्वयंभू आहे. त्यामागे आख्यायिका आहे. (अर्थात काही ठिकाणी भद्रकाली परिसरातील भद्रकाली मातेचे मंदिर हे हनुवटी पडण्याचे ठिकाण मानले जाते.) सती ही ब्रह्माचा पुत्र दक्ष प्रजापतीची कन्या. दक्ष प्रजापतीने कनखल (हरिद्वार) येथे आयोजित केलेल्या ‘बृहस्पति सर्व’ नामक यज्ञसमारंभाप्रसंगी कन्या सती व जामाता शंकर यांना हेतूपुरस्सर आमंत्रित केले नाही. परंतु पित्याने केलेला यज्ञ म्हणून सती तेथे गेली व तेथे दक्षाने सर्व देवीदेवतांना हविर्भाग अर्पण केल्यावर शंकराला मात्र तो दिला नाही याचा अपमान वाटून सतीने यज्ञकुंडात उडी घेतली व शरीर नष्ट केले. अंतर्ज्ञानाने ही गोष्ट कळताच शंकरांचा संताप अनावर झाला व त्यांनी वीरभद्रास यज्ञ नष्ट व सर्वांना शासन करण्यास सांगितले. जळालेले सतीचे कलेवर घेऊन ते त्रिलोकात फिरू लागले तेव्हा हाहाकार माजला आणि महाविष्णुंनी सुदर्शन चक्राने सती मातेच्या शरीराचे तुकडे केले. ते जेथे जेथे पडले तेथे शक्तीपीठांची निर्मिती झाली. सतीमातेची हनुवटी जेथे पडली त्या डोंगरावर शक्तीपीठ निर्माण झाले. कालांतराने त्याला सप्तश्रुंग गड म्हणण्यात आले. हीच माता सप्तश्रुंगी. आदिमाया भगवती खुद्द येथे विराजमान आहे. येथे देवीला भ्रामरी नावाने संबोधण्यात येते, विकृताक्ष हा येथे मातेचा भैरव आहे. तो मातेच्या खालीच दहा पायऱ्यांवर आहे. दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेख सापडतात. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभावांचा आद्यग्रंथ लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की, राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय. नाथसंप्रदायाच्या नवनाथ भक्तीसार या ग्रंथात दुसऱ्या अध्यायात असे वर्णन येते की, गुरू दत्तात्रेय व महादेव अरण्यात गमन करत असताना महादेवांना तेथे कुणीतरी योगी तपश्चर्या करत असल्याचे कळते ते दत्तगुरुंना त्यांना आणण्यासाठी पाठवतात तर ते मच्छिंद्रनाथ असतात. हे दोघे त्यांना सांगतात की, तुझी इच्छा आदिशक्ती सप्तश्रृंगी देवी पूर्ण करेल आणि शाबरी विद्येची खरी सुरुवात सप्तश्रृंग गडावरून होते. संत निवृत्तीनाथांनीदेखील समाधी घेण्यापूर्वी काही काळ सप्तशृंग गड येथे साधना केली असल्याचे उल्लेख आहेत. साईबाबांच्या काळातीलही एक संदर्भ देता येईल बाबांनी आपल्या एका भक्ताची मनोकामना पूर्ण होण्यासाठी सप्तशृंगी मातेला नवस केला होता व ते दर्शनासाठी येथे आलेही होते. या देवीचा विडा प्रसाद म्हणून नेण्याची परंपरा भक्तांमध्ये आहे. नागवेलीचे पान, काथ, चुना व सुपारी टाकून बनविण्यात येणारा विडा वणीची देवी आदिमाया सप्तश्रुंगी मातेच्या मुखात ठेवला जातो. विड्याच्या पानाची उत्पत्ती कथा मजेशीर आहे, त्यातील फॅण्टसी थोडी बाजूला ठेवून गर्भितार्थ घेतला तर आपल्या लक्षात येईल की आपली संस्कृती किती व्यापक आहे. समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. थोडे अमृत शिल्लक राहिले. मोहिनीने हे उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृता मधून एक वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला व तिला नागवेल असे म्हटले. भोजन झाल्यावर देव देवता या नागवेलीच्या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. त्यातूनच पुढे महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा ठेवण्यात येऊ लागला. त्यावेळी सर्व देवांनी या विड्यास आशीर्वाद दिला की आम्ही तुझ्यामध्ये वास करू आणि सर्व देवीदेवता त्यात विराजमान झाले. त्यामुळे विड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विषय आहे, सप्तश्रुंगी मातेच्या विड्याचा. देवीच्या मुखात पूर्वापार विडा ठेवण्यात येतो. मानवी देहामध्ये शक्तीचे सात पुंजके असतात, कुणी त्याला कुंडलिनी म्हणते, कुणी आणखी काही. या शक्तीपुंजक्याला सकारात्मक ऊर्जा हा विडा देतो. नागवेल हादेखील एक शक्तीपुंज आहे. वणीच्या सप्तश्रृंगी देवीच्या मुखातील नैवेद्य असलेल्या नागवेलीच्या पानाने देहात वाणीशक्ती प्राप्त होत असते. शरीरामधल्या डिस्टर्ब झालेल्या मार्गाला वणीच्या देवीचा हा प्रसाद दुरुस्त करतो. तमोगुण, रजोगुण व सत्त्वगुण हे पूर्णपणे जागृत झाल्यानंतर तुम्ही देवत्वाकडे जातात, तुम्ही सिद्ध होतात. भक्ती-शक्तीचे पीठ असलेल्या गडावरच्या देवीकडे आपण काय मागावे हे आपल्याला कळले पाहिजे. ही देवी आध्यात्मिक देण्याचे सामर्थ्य ठेवते त्यामुळे तिच्याकडे ते मागा. आपण मनोमन जे मागतो ते देवी ऐकत असते. आपल्या मनातले भाव ती ओळखत असते. परंतु तरीही देवाजवळ काही मागावयाचे असल्यास ते मोठ्याने मागा. तुम्ही बोलल्याने जे शब्द बाहेर येतात, त्या स्पंदनांमध्ये तो वर पूर्ण करण्याची शक्ती असते.

 

संदर्भ : मार्कंडेय ऋषी रचित मार्कंडेय पुराण

देवी सप्तशती 

धुंडिसूत मालूकवी रचित नवनाथ भक्तीसार

देवी भागवत व देवी विजय 

गणपती

 

गणपती

 

गणानां त्वं गणपति हवामहे । प्रियानां त्वां प्रियपती हवामहे।।

निधीनां त्वां निधीपती हवामहे। वसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम।।

 

प्राचीन हिंदू धर्मग्रंथ ऋग्वेदात गणपती देवतेचा वरील उल्लेख प्रथम मिळतो. इतर कोणत्याही दैवतापेक्षा अधिक वैविध्य गणपती या देवतेमध्ये आहे. याचे कारण म्हणजे वैदिक काळापासून गणपतीचे अनेक अवतार मानण्यात आले आहेत. प्रत्येक काळात गणपतीचा एक अवतार मानण्यात येतो. गणपतीच्या जन्माच्या वेगवेगळ्या हकीकती आहेत पैकी देवीपुराणानुसार शक्तिस्वरूप माता पार्वतीने अंगमळापासून केलेल्या पुतळ्यात प्राण फुंकले व स्नान करण्यासाठी गेली असता महादेव तेथे येऊन प्रवेश मागू लागले. त्यातून दोघांचे युद्ध होऊन महादेवाने त्याचा शिरच्छेद केला. हे कळताच माता पार्वती आक्रोश करू लागल्या व महादेवाने उत्तरेकडील प्रथम जो दृष्टीस पडेल त्याचे शीर आणावयास सांगितल्याने हत्तीचे शीर आणून या पुतळ्याला जोडण्यात आले व गणपतीचे निर्माण झाले. ही कथा अधिक प्रचलित आहे. ब्रह्मवैवर्तपुराणानुसार माता पार्वती गदापद्मधारी श्रीकृष्णाच्या रूपावर मोहित होऊन असाच पुत्र व्हावा अशी इच्छा प्रकट केली असता श्रीकृष्णांनी गर्भात शिरून गणपतीचे रूप धारण केले ही एक कथा आहे. स्कंद पुराणात सिन्दूर नावाच्या दैत्याने माता पार्वतीच्या गर्भात प्रवेश करून गणेशाचे मस्त छिन्न केले. जन्मानंतर नारद मुनींच्या सांगण्यानुसार गजराजाचे शीर जोडण्यात आले.  

गणपतीच्या अनेक नावांपैकी दोन नावे म्हणजे बृहस्पति व वाचस्पति ही नावे ऋग्वैदिक काळात अधिक प्रचलित होती. ज्योतिर्मय मानल्या गेलेल्या या देवतेचा वर्ण लालसर होता. अंकुश व परशु ही शस्त्रे तिच्या हाती होती तर ‘गण’ नावाच्या शिव पार्वतीचे सेवक असलेल्या, नृत्य करणाऱ्या एका दलाबरोबर ही देवता कायम रहात असल्याने तिला ‘गणपती’ असे संबोधन होते. गणांचा अधिपती, देवांचा रक्षक अशीही गणपतीची प्रतिमा आहे.(१) दुसऱ्या एका मतानुसार अनार्यांची हस्तिदेवता व यक्ष यांच्या एकत्रीकरणातून गणपतीची निर्मिती झाली असा उल्लेख आहे, गणपतीचे वाहन उंदीर असून ते अनार्यांच्या आदिम संस्कृतीचे प्रतिक असल्याचेही मानण्यात येते.(२,३) तंत्र मतानुसार देवी सरस्वतीला गजाननाची पत्नी मानण्यात येते. त्यामुळेच ‘संगे सरस्वती घेऊन आले गणपती गजानन’ अशी गीते पुढे प्रचलित झाली. रिद्धी सिद्धी या गणपतीच्या दोन पत्नी असेही सांगण्यात येते. तर तंत्रमार्गात ‘गणेशानी’ ही गणपतीची पत्नी मानण्यात येते. गणेशाला तीव्रा, ज्वालिनी, नन्दा, सुभोगदा, कामरूपिनी, उग्रा, तेजोवती, सत्या आणि विघ्ननाशिनी नावाच्या इतर नऊ पत्नी असल्याचेही उल्लेख आहेत.  

चौथ्या शतकातील कालिदास, पाचव्या शतकातील पंचतंत्र किंवा भरताचे नाट्यशास्त्र तसेच सहाव्या शतकातील भारवी यांच्या काळात गणपतीचा कोठेही उल्लेख आढळत नाही.  गुप्त काळापासूनच या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असे अभ्यासक मानतात. (४) गणेशाचा उपासक संप्रदाय गाणपत्य नावाने ओळखला जातो.या संप्रदायाचा उगम पंधराव्या शतकात झाला असे मानले जाते.(५) हा संप्रदाय गणेशाची मयूरेश्वर नावाने पूजा करतो. त्यांचा मुख्य मंत्र, गणेश गायत्री मंत्र आहे. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात हो तो मंत्र. आदी शंकराचार्यांनी गणपतीस पाच मुख्य देवतेत स्थान दिल्यावर गणपतीची दैवत म्हणून लोकप्रियता वाढली. गणपतीच्या उपासकांचा ‘गाणपत्य’ संप्रदाय निर्माण झाला. या शतकांमध्ये गणपतीचा उल्लेख नसला तरीही इसवी सनाच्या पहिल्या शतकात निर्माण करण्यात आलेली व श्रीलंकेतील मिहिनटाल येथे मिळालेली मूर्ती आतापर्यंतची प्राचीन गणेशमूर्ती आहे. उत्तर प्रदेशाच्या फरूखाबाद जिल्ह्यात चौथ्या शतकात निर्मिलेली द्बिभुज दगडी गणेशमूर्ती पहायला मिळते. इसवी सनाच्या पाचव्या शतकात निर्मिलेली मध्यप्रदेशातील उदयगिरी येथे मोदक खाणाऱ्या गणपतीची मूर्तीही मिळालेली आहे. जबलपूर येथे हत्तीमुख असलेल्या देवीची मूर्तीदेखील मिळाली आहे. तंत्रमार्गात उल्लेखित गणेशपत्नी ‘गणेशानी’ हीच असावी असा अंदाज बांधण्यात आला आहे.

गणपतीचे महान कार्य म्हणजे व्यास मुनींनी सांगितलेले महाभारत लिहिण्याचे काम. महाभारताच्या युद्धानंतर व्यथित होऊन व्यासमुनी बसलेले असताना त्यांना सर्व गोष्टींचे स्मरण होऊ लागले तेव्हा त्यांनी महाभात नावाने एका महाग्रंथाची निर्मिती करण्याचा विचार केला अआणि बुद्धीचे दैवत गणपतीला आपले लेखनिक बनण्याची विनंती केली. सांगताना थांबायचे नाही अशी अट गणरायाने तर समजल्याशिवाय श्लोक लिहायचा नाही अट व्यासांनी घातली आणि महाभारताचे निर्माण झाले. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार महाविष्णुंचा अवतार मानल्या गेलेल्या परशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करून ते कैलास पर्वतावर आले असता, द्बाररक्षक गणेशाने त्यांना अडवले तेव्हा दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. यात परशुरामांनी आपल्या परशुने गणेशाचा एक दात तोडला. (म्हणून तो एकदंत) याच दाताचा उपयोग महाभारत लिहिताना लेखणी म्हणून केला गेल्याचे अनेक ग्रंथामध्ये सांगितले गेले.   

मराठी साहित्याच्या प्रारंभ काळापासून गणेशाचे उल्लेख आहेत. मराठी भाषेमधील आद्य वाङ्मयकार असलेल्या महानुभाव पंथातील कवी नरेंद्र यांच्या ‘रुक्मिणीस्वयंवर’ ग्रंथात गणपतीचा पुढील उल्लेख येतो, ‘तेया गणरायाचे उदार रूपडे। थोरपण जिंकले होडे ।।’ तर ज्ञानेश्वरीमध्ये प्रारंभीच ज्ञानेश्वरांनी गणरायाला नमन केले आहे, ओम नमोजी आद्या। वेद प्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।। देवा तुचि गणेशु । सकल मतिप्रकाशु। म्हणे निवृत्तीदासु । अवधारिजोजी ।। त्यानंतर संत नामदेव, संत तुकाराम यांनीही आपल्या अभंगातून गणरायाचा उल्लेख केला आहे. गणपती लोकसाहित्यातही आहे, तमाशातला प्रारंभीचा गण गणेशस्तवनाचा असतो. यात गणपती ऋद्धीसिद्धींसह नाचत येतो. तर अशा या गणपतीला पेशव्यांच्या पुजनात मानाचे स्थान होते. एका मान्यतेनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीलाही गणेशाचा जन्म मानण्यात येतो. पेशवे हाच काळ मानत असत, त्यातून गणरायाच्या पुजनाची परंपरा पुढे आली. पेशव्यांच्या काळात केवळ घराघरात पुजला जाणारा गणपती लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक स्वरूपात आणला. लोकांच्या एकत्रीकरणातून स्वराज्य मिळवण्यासाठी चर्चा झडतील असा त्यामागचा उद्देश होता. परंतु टिळकांनी गणेशाच्या पुजनास उत्सवाचे दिलेले स्वरूप सुधारकी व सनातनी दोन्ही विचारधारेला मान्य झाले नाही. त्यामुळे टिळक महाराजांवर प्रचंड टिका झाली. काही जणांच्या म्हणण्यानुसार याआधी केवळ निसर्गदत्त प्रतिकांची पुजा करण्यात येत होती. गणपतीच्या पुजेनंतर देवीदेवता प्रचलित झाले परंतु या विधानास कोठेही पुरावा सापडत नाही.

खगोलशास्त्रज्ञ दा.कृ.सोमण यांच्या मतानुसार भाद्रपदात शेतात धान्य तयार होतं. पृथ्वीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे गणपती. म्हणूनच पार्थिव गणेशपूजन असं पंचांगात लिहिलेलं असतं. पृथ्वीची कशी पूजा करणार म्हणून प्रथम पूजन करायच्या गणपतीला नदीकिनारी असलेल्या मातीतून निर्माण करायचं, तिथेच त्याची पूजा करायची आणि लगेच तिथेच विसर्जन करायचं अशी पद्धत होती. अजूनही दक्षिण हिंदुस्थानात हीच प्रथा आहे.

गण म्हणजे समूह. आपण देव, राक्षस, मनुष्य, ऋषी, पितर हे गण म्हणतो. या  सर्व गणांचा अधिपती जो आहे तो गणपती. मूळात सृष्टी ही अव्यक्त होती तिला व्यक्त रूपात येण्याची इच्छा झाली, हा जो बहुधा भाव (एकोहम बहुस्याम) तोच विश्वाचे कारण आहे. हा बहुस्याम भाककव म्हणजे गण. या गणांमध्ये जो सर्वप्रथम आला तो गणपती. त्यापासून पुढे सर्व निर्माण झाले. विज्ञानाच्या भाषेत यालाच युनिव्हर्सल म्हटले जाते. यातून एकच गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की आपण गणपतीची पूजा करतो म्हणजे आपल्या मूळाची पुजा करतो. ‘त्वं मूलाधार: स्थितोसि नित्यम’ हे जे गणपती अथर्वशीर्षात येते ते त्याच कारणाने. गणपती म्हणजे आपल्याला या युनिव्हर्सलसोबत बांधून ठेवणारा बिंदू, ‘बिंदुरूत्तररूपम’ हे त्यातूनच आलेय. म्हणून गणपतीची पूजा म्हणजे मुळाची, मुळ चेतनेची पुजा आाज करूया व विशश्वचैतन्य शक्तीसोबत स्वत:ला जोडून घेऊया. 

ॐ गं गणपतये नम:     

 

संदर्भ :

१. Gadgil, Sadashiv Ramchandra (1974). Lokāyata. Loka Vāñmaya Gr̥ha.

२. Hindu Gods and Goddesses, Swami Harshananda, Sri Ramakrishna Math, Chennai, 1981, p.125-27

३. Jain, Sandhya (2018). Aadidev Aarya Devata (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789352668731.

४.  Higham, Charles (2014-05-14). Encyclopedia of Ancient Asian Civilizations (इंग्रजी भाषेत). Infobase Publishing. ISBN 9781438109961.

५.  Gune, Dr Ashok Modak, Prof Prabhakar Nanakar, Prof Narayan (2019). Desh-Videshon Ki Rashtriya Vichardharayen (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9789353221553.

६. ज्ञानेश्वरी अध्याय पहिला

  मार्केटचे दिवस मार्केटचे ते दिवस छान होते. सायंकाळचे पाच वाजलेले. भाजीने भरलेला टेम्पो घेऊन, त्या घमघमणाऱ्या सुगंधात मधोमध उभा राहून मी मा...